Manoj Jarange: ‘मला 20, 30 जणांनी दाबले आणि जबरदस्ती…’; उपोषणादरम्यान जरांगे यांच्यासोबत नेमकं काय घडलं, पाहा….

Manoj Jarange Hunger Strike । मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं. त्यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 5 वा दिवस आहे. मात्र, त्यांच्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीतील उपोषण स्थगित करणार असल्याचे सांगितले आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
उपोषण स्थगित करत असताना त्यामागचे कारणही त्यांनी सांगितले आहे. मनोज जरांगे यांची तब्येत ढासळल्याने त्यांना त्यांच्या गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आणि उपचार घेण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर आज मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती दिली आहे.
यावेळी बोलताना जरांगे यांनी, “मी उपोषण करायला तयार आहे. मात्र, गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही. विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे.
सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही. खोटं आणि बेगडी उपोषण मी करणार नाही. उपचार बंद करा मी उपोषण करायला तयार आहे, असे म्हटले. तर सलाईन लावून पडून राहण्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं” असंही जरांगेंनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले, “माझे उपोषण व्यवस्थित सुरु होते. मात्र काल रात्री माझी तब्येत बिघडली. माझी शुगर कमी झाली. त्यावेळी डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि मला शरीराला धोका आहे, असे सांगितले. त्यानंतर मला अनेक कार्यकर्त्यांनी उपोषण सोडण्याची मागणी केली. मी त्यांचे ऐकत नसल्याने मला 20, 30 जणांनी दाबले आणि जबरदस्ती सलाईन लावले.
यावेळी कार्यकर्त्यांसह समाजाचे असं म्हणणं होतं की, आपल्याला आरक्षण उशिरा भेटेल, पण आम्हाला तुम्ही पाहिजेत. तुम्ही आम्हाला पाडायचे सांगा, तुम्ही सांगितले तर आम्ही बापाला पाडतो. मग ते भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस किंवा इतर कोणीही असतो..’ असे जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगेंची तब्येत ढासळली
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळल्याने चालली आहे. जरांगेंची शुगर 62 तर बीपी 98 पर्यंत गेला आहे. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमधून ही बाब समोर आली आहे.
जरांगेंची सर्व तपासणी करणाऱ्या डॉ. पाटील यांनी याबाबत माहिती दिली. मनोज जरांगे यांनी सध्या उपचार घेण्याची खूप जास्त गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहेत. जरांगेंनी असं न केल्यास ते बेशुद्ध होवू शकतात, असं डॉक्टर म्हणालेत.





