Yogi Adityanath : “विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी तुम्ही संपवली..”; मनुस्मृतीवरील वक्तव्यावरून राहुल गांधींवर हल्लाबोल
मनुस्मृतीवरील वक्तव्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

Yogi Adityanath – मनुस्मृतीवरील वक्तव्यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.
भारताच्या परंपरा आणि वारशावर टीका करणे हा राहुल गांधी आपला जन्मसिद्ध हक्क समजतात, असा आरोप योगींनी केला. तसेच, विरोधी पक्षनेते म्हणून असलेली जबाबदारी त्यांनी पूर्णपणे संपवली असल्याचे ते म्हणाले.
१८५७च्या उठावातील नेते राणा बेनी माधव बख्श सिंह यांच्या २२२व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात योगी बोलत होते. रायबरेली हा राहुल गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ आहे.
तुम्ही संविधानाची शपथ घेतली आणि त्यानंतर भारताच्या परंपरा व वारशावर टीका करणे हा आपला जन्मसिद्ध हक्क मानता. उत्तर प्रदेशाबाहेर गेल्यावर उत्तर प्रदेशाची आणि भारताबाहेर गेल्यावर भारताची बदनामी करता, असा आरोप योगींनी केला.
राहुल गांधी यांनी शनिवारी महाराष्ट्रातील विद्यार्थिनींसोबतच्या संवादात ‘मनुस्मृतीच्या मानसिकते’वर टीका केली होती. महिलांनी पितृसत्ताक व्यवस्थेच्या बंधनातून मुक्त होऊन स्वतःच्या अधिकारांसाठी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले होते.
यावर प्रतिक्रिया देताना योगींनी मनूविषयी माहिती हवी असल्यास अथर्ववेद, शतपथ ब्राह्मण आणि मत्स्य पुराण यांसारखे ग्रंथ वाचावेत, असे सांगितले.
योगींनी राहुल गांधी यांच्या भारतीय लष्कर, दहशतवाद आणि अयोध्येतील राम मंदिराबाबतच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. देशाच्या सुरक्षेसाठी लष्कर कारवाई करत असताना पुरावे मागणे आणि दहशतवादाविरोधातील लढ्यात देशविरोधी घटकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रोत्साहन देणे, असे आरोप त्यांनी केले.
कॉंग्रेसकडून इतिहासाचे चुकीचे चित्रण
‘अर्बन नक्षल’च्या माध्यमातून देशातील सध्याच्या पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न का केला जात आहे, असा सवालही त्यांनी केला. पंतप्रधानांवर अपमानास्पद वक्तव्य करणे म्हणजे केवळ व्यक्तीचा नव्हे, तर देशाच्या संस्थेचा अपमान असल्याचे योगी म्हणाले.
काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर देशाच्या इतिहासाचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोपही त्यांनी केला. राणा बेनी माधव बख्श सिंह यांच्या नावाने उभारलेल्या २१ कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या स्मारक सभागृहाचे उद्घाटन यावेळी योगींनी केले.





