नवी दिल्ली : तोट्यात सुरू असलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियाचं खासगीकरण न झाल्यास की कंपनी बंद करावी लागणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली. राज्यसभेत एका चर्चेदरम्यान उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. सरकार आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या हितास अनुकूल असलेला निर्णय घेण्यासाठी वचनबद्ध आहे, असंही ते म्हणाले.
सध्या बोली प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या हिंतांच रक्षण केलं जाईल. तसंच खासगीकरणानंतर कोणत्याही कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गडांतर येणार नाही, असं पुरी यांनी यावेळी स्पष्ट केलं. जर एअर इंडियाची खासगीकरणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास कंपनी बंद करावी लागणार आहे. सध्या निर्गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आम्ही काही निर्णय घेतले आहे. तसंच काही अन्य निर्णयांची प्रक्रियाही सुरू आहे. बोली प्रक्रियेत आम्हाला किती जणांचा प्रतिसाद मिळेल हे पाहिलं जाणार आहे. तसंच कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करूनच पुढईल निर्णय घेण्यात येणार आहे. एअर इंडिया आर्थिक संकटात असल्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यात उशिर होत असल्यामुळे काही वैमानिकांनी नोकरी सोडली हे खरं आहे का असा सवाल पुरी यांना करण्यात आला. यावर उत्तर देताना वेतन न मिळाल्यामुळे वैमानिकांनी नोकरी सोडल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही, असं ते म्हणाले.
ज्यावेळी एअर इंडिया आर्थिक संकटात होती, त्यावेळी काही कर्मचाऱ्यांचं 25 टक्के वेतन थकित होतं. निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यात येणार असल्याची माहिती पुरी यांनी दिली.