सातारा,दि.13 प्रतिनिधी-
दुष्काळग्रस्तांसाठी पाण्याच्या टॅंकर वाटप निमित्ताने खा.शरद पवार यांनी रोहित पवारांसाठी चाचपणी केल्यानंतर आ.जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांच्या विरोधात लढायला मजा येईल, अशी प्रतिक्रिया दिली. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. उगाच चुटपुटची लढाई करण्यापेक्षा थेट पवारांच्या विरोधात लढण्यास सज्ज असल्याचे आ.गोरे यांनी सांगितले.
साताऱ्यात नीरा-देवघर धरणातील पाणी वाटपाच्या निर्णयानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आ.गोरे बोलत होते. यावेळी आ.गोरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्यावर थेट टिका केली. ज्या पवारांना 50 वर्षात सातारा जिल्ह्याने साथ देवून ही त्यांच्यावर दुष्काळ पाहणी करण्याची वेळ येते.
वास्तविक दुष्काळाची निर्मिती पवारांकडून झाली आहे. एका बाजूला दुष्काळग्रस्तांना दुष्काळातच ठेवून जखमी ठेवायचे आणि नंतर टॅंकर व खासदार निधीचा मलम लावायचा. वास्तविक त्यांना टॅंकर देताना, छावणतील जनावरे पाहताना आनंद होतो का ? असा सवाल उपस्थित करत यापुढे आमच्या जखमांवर आणखी मीठ चोळू नका, असे आवाहन पवार यांना केले.
दरम्यान, आ.गोरे यांच्या पत्रकार परिषदेला खा.रणजितसिंह ना.निंबाळकर उशिरा उपस्थित राहिले. त्यावेळी आ.गोरे यांच्या भाजपप्रवेशाबाबत विचारणा पत्रकारांनी केली. त्यावर आ.गोरे म्हणाले, मी जिथे आहे, तिथे सुखी आहे. जे साध्य करायचे होते ते केले. ज्या ज्यावेळी ज्या गोष्टी व्हायच्या. त्या होवून जात असतात. आजपर्यंत अनेकांनी माझ्यापुढे अडचणी निर्माण केल्या.
खोटे गुन्हे दाखल केले. मात्र, तरी जयकुमारला कोणी थांबवू शकले नाहीत. अशांचा कार्यक्रम होणार आहे. नीरा-देवघरच्या पाण्यासाठी जे 12 वर्षात जमले नाही ते 12 दिवसांमध्ये खा.रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी करून दाखविले आहे, असे सांगत आ.गोरे यांनी आमचं बरेच काही ठरलंय, त्याचे परिणाम दिसतायत आणि यापुढे ही दिसतील, अशा शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली.