हिमांशू
शहरात ज्ञानी कोण आहे, असं विचारलं तर कुणाला सांगता येत नाही; परंतु तुम्ही ज्ञानी आहात का, असं विचारलं तर प्रत्येकजण होकारार्थी उत्तर देतो, अशा आशयाची गमतीशीर टिप्पणी लेखक श्याम मनोहर यांनी “अंधारात मठ्ठ काळा बैल’ या मुक्तचिंतनात केली होती. आपल्या देशात वाघ आणि त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी असलेली मंडळी यांच्या बाबतीत काहीसं तसंच म्हणता येईल. सत्ताधारी आणि विरोधक बदलत राहतात; पण प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला आपल्या पक्षाचा नेता वाघच वाटतो. देशात वाघांची संख्या किती आहे आणि किती वाघांची राजरोस शिकार होते, असं विचारलं तर कुणालाच उत्तर देता येत नाही. तात्पर्य, आपल्याकडे मानवी वाघ वाढत चालले आहेत आणि खरे वाघ मात्र जीव मुठीत धरून जगत आहेत. वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी आहे आणि वाघांची जगात सर्वाधिक संख्याही आपल्या देशात आहे, हे आपल्यासाठी गौरवास्पद असायला हवं. वाघांच्या वाढत्या संख्येची आकडेवारी मधूनमधून प्रकाशित केली जाते; परंतु त्यांच्या शिकारीची आकडेवारी आपल्याला फारशी कळत नाही. केंब्रिज येथील “ट्रॅफिक इंटरनॅशनल’ या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात यासंदर्भात प्रसिद्ध झालेली आकडेवारी धक्कादायक तर आहेच; परंतु मानवी वाघ वाढत असताना ती लज्जास्पदसुद्धा आहे. वाघांच्या शिकारीच्या बाबतीत भारताचा पहिला क्रमांक असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
सन 2000 ते 2018 या कालावधीतील आकडेवारी गृहीत धरून हे सर्वेक्षण करण्यात आलंय. त्यानुसार गेल्या 19 वर्षांमध्ये जगभरात तब्बल 1,977 म्हणजे जवळजवळ दोन हजार वाघांची शिकार करण्यात आली. एकट्या भारतातच गेल्या 19 वर्षांत 626 वाघांची शिकार करण्यात आली, असं हा अहवाल सांगतो आहे. वाघ हा जीवसाखळीतला सर्वोच्च प्राणी (ऍपेक्स ऍनिमल) मानला जातो. वाघांची संख्या अधिक असणं म्हणजे देशातली जैवविविधता चांगली असणं, असं मानलं जातं. जगातील सर्वाधिक वाघ आपल्याकडे असणं ही तसं पाहायला गेलं तर अभिमानास्पद गोष्ट. परंतु आपल्याकडे अनेक अभिमानास्पद गोष्टी दररोज घडत असताना बिचाऱ्या वाघांकडे पाहायला फुरसत कुणाला आहे? काही वर्षांपूर्वी किमान सर्कशीत तरी वाघ दिसत होते. पुढं प्राणिमित्रांच्या आक्षेपामुळं सर्कशीत वाघ-सिंहांचे खेळ दाखवायला बंदी करण्यात आली. परंतु जंगलातल्या वाघांची शिकार होण्याचं प्रमाण पाहता, सर्कशीतच वाघ सुरक्षित होते की काय, असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. गेल्या 19 वर्षांत भारतात 626 वाघांची शिकार झाली असली, तरी नोंदवलेल्या प्रकरणांची संख्या 463 एवढीच आहे. ज्या विलापाची दखल घेतली जात नाही, त्याला “अरण्यरुदन’ म्हणतात. दुर्दैवानं अरण्यातल्या राजस प्राण्यावरच ही वेळ आली आहे.
अशा बाबतीत आपण नेहमी उलट्या बाजूनं विचार करायला हवा. वाघांची शिकार ज्या कारणांसाठी होते, ती शोधून काढली पाहिजेत. सोन्यानं मढवलेलं वाघनख गळ्यात घालून कुणी समोर आल्यावर आपल्याला तो भलताच शूर वाटतो. वस्तुतः ते नख त्यानं महागामोलानं विकत घेतलेलं असतं. अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन जरी आपण बदलला तरी पुष्कळ आहे. वाघाचं काळीज असलेल्या सोशलवीरांनी सोशल मीडियाची ताकद अशा कारणांसाठी वापरायला काय हरकत आहे?