प्रभात वृत्तसेवा पुणे : सरलेल्या वर्षात तब्बल साडेसहा कोटी पुणेकरांनी मेट्रोने प्रवास करून पुण्यात मेट्रोची काय गरज, असा प्रश्न विचारणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना चपराक दिली आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रो हा मुद्दा भाजपाने पुढे केला आहे. मेट्रोने जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे भाजपाच्या प्रचारास बळ मिळाल्याचे दिसते आहे.मार्च २०२२ मध्ये पहिली मेट्रो पुण्यातून धावली. तेव्हापासून मेट्रोच्या प्रवासी संख्येत दरवर्षी टप्प्या-टप्प्याने मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. उद्घाटनापासून डिसेंबर २०२५ पर्यंत जवळपास साडेदहा कोटी पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केल्याची माहिती आकडेवारीतून समोर आली आहे. २०२५ मध्ये पुणे मेट्रोने विक्रमी वाढ नोंदवली. सरत्या वर्षात ६.७ कोटींपेक्षा अधिक प्रवाशांनी मेट्रोच्या आरामदायी, वेगवान, वातानुकूलित आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेतला. यातून पुणे मेट्रोला १०७.६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आग्रहामुळे पुण्यात मेट्रो सुरु झाली. पुण्यात मेट्रो असली पाहिजे, ही चर्चा २००० नंतर सुरू झाली. तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला मेट्रो सुरू करण्यासाठी आवश्यक राजकीय इच्छाशक्ती दाखवता आली नाही. २०१४ मध्ये देशात आणि राज्यात भाजपा सरकार आल्यानंतरच पुण्यातल्या मेट्रोला चालना मिळाली. त्याहीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुणेकरांना मेट्रो कशाला, असा विरोध जाहीरपणे केला. मात्र वाढत्या पुण्याची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने पुण्यात मेट्रो आणली. आज विद्यार्थी, नोकरदार आणि सर्वसामान्य पुणेकरांना वेगवान प्रवासाची सुविधा शहरात उपलब्ध झाली आहे. मेट्रोचे लाभ लक्षात घेऊन आपल्या भागातसुद्धा मेट्रो यावी, अशी मागणी आता पुणेकरांकडून होऊ लागली आहे. त्याला प्रतिसाद देत भाजपा सरकारने मेट्रोच्या विस्तारासाठी नियोजन केले आहे. येत्या काही महिन्यांतच शिवाजीनगर ते हिंजवडी ही मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्या व्यतिरिक्त सिंहगड रस्ता, नगर रस्ता, सोलापूर रस्ता तसेच पिंपरी-चिंचवड शहर अशा पुण्याच्या चारही दिशांना मेट्रोचा विस्तार होणार आहे. पुणेकर जगभर प्रवास करतात. अत्याधुनिक शहरांमध्ये पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किती गरजेची आहे, हे सूज्ञ पुणेकरांना चांगले समजते. काही विरोधकांनी अज्ञानातून मेट्रोवर केलेल्या टीकेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज नाही. पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करणे व त्यांना सुरक्षित प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून देण्यास भाजपाचे प्राधान्य आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने आम्ही मेट्रोचा विस्तार करत राहू. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री