प्रभात वृत्तसेवा रांजणी – जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा मार्ग आता जवळजवळ मोकळा झाला आहे. त्या अनुषंगाने आंबेगाव तालुक्यात प्रथमच शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर तालुक्याच्या राजकारणात अमुलाग्र बदल झाला आहे. या बदलाचा परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत निश्चितच दिसून येणार आहे. कारण कार्यकर्ते आणि मतदार दोन गटात विभागले गेल्याने राजकीय पक्षांच्या स्थानिक नेतृत्वाचा कस देखील होणाऱ्या निवडणुकीत लागणार तितकेच हे खरे.आंबेगाव तालुक्याच्या राजकीय विश्लेषणाबाबत स्पष्टीकरण द्यायचे झाले तर 2024 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विभागले होते आणि त्याच पार्श्वभूमीवर आंबेगाव विधानसभेची निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली. तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे केवळ १ हजार ५३० मतांनी विजयी झाले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार देवदत्त निकम यांनी चांगलीच लढत दिली.वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर तालुक्यातील विधानसभेची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. दस्तूर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंचरच्या जाहीर सभेत दिलीप वळसे पाटील यांना पराभूत करण्याचे आवाहन केले होते. मात्र, थोड्या मतांनी का होईना वळसे पाटील विजयी झाले. त्या निवडणुकीत गुरुपेक्षा शिष्य वरचढ ठरला.तालुक्यात विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. विशेषतः गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे तालुक्यातील स्थानिक राजकीय समीकरणे देखील आता मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. आगामी निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांइतकाच स्थानिक नेतृत्वाचाही या निवडणुकीत कस लागणार असल्याचे चित्र दिसून येते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे संभाव्य इच्छुक उमेदवारांना उमेदवारी मिळाली नाही तर ते बंडखोरी करण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.अशा परिस्थितीत पक्षाचे दोन गट पडले असताना स्थानिक नेतृत्वापुढे बंडखोरांना कसे रोखायचे याबाबत सतर्कता बाळगावी लागेल.दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता असल्याने तालुक्यातील राजकारण पुन्हा तापु लागले आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकांचा विचार करता तालुक्याची राजकीय राजधानी असलेल्या मंचर नगरपंचायतीच्या निवडणूक निकालावर देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजकिय अस्तित्व महत्त्वपूर्ण मानले जात असून मंचर नगरपंचायतीचा निकाल आज रविवारी लागणार आहे. हा निकाल लागल्यानंतरच तालुक्यातील राजकारणाची दिशा नक्की कोणत्या बाजूने असणार हे देखील कळणार आहे.