Yuvraj Singh : ‘…तरी माझ्यासाठी हा विजयच आहे’, युवीने युवा टीम इंडियासह गिलच्या इंग्लंडमधील कामगिरीचे केले कौतुक

Yuvraj Singh praises Shubman Gill : इंग्लंड दौऱ्यावर भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलने आपल्या नेतृत्वाने आणि फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत गिलने 754 धावांचा डोंगर उभा केला. यामुळे “गिलला परदेशात धावा करता येत नाहीत,” अशी टीका करणाऱ्यांना त्याने सणसणीत उत्तर दिले. आता भारताचा माजी खेळाडू युवराज सिंगने गिलचे कौतुक करताना टीका करणाऱ्यांना आरसा दाखवला आहे.
युवराज सिंगकडून गिलचे कौतुक –
आयसीसीच्या शोमध्ये बोलताना भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने शुबमन गिलचे तोंडभरून कौतुक केले. युवराज सिंग म्हणाला, “गिलच्या परदेशातील खेळावर प्रश्न उपस्थित केले जात होते. पण कर्णधार बनल्यानंतर त्याने चार शतके ठोकली. ही कामगिरी अप्रतिम आहे. जबाबदारी मिळाल्यावर ती कशी स्वीकारली जाते, हे गिलने दाखवून दिले.”
मला या संघाचा अभिमान – युवराज सिंग
युवराजने गिलच्या युवा ब्रिगेडचेही कौतुक केले. तो म्हणाला “ही मालिका बरोबरीत संपली असली, तरी माझ्यासाठी हा विजयच आहे. इंग्लंडसारख्या देशात नव्या संघासह अशी कामगिरी करणे सोपे नाही. मला या संघाचा अभिमान आहे,” शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडच्या धर्तीवर आपली छाप पाडली आणि भविष्यातील आशादायी चित्र उभे केले.
हेही वाचा – WI vs PAK : ‘या दोघांना फक्त जाहिराती करायला सांगा…’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूची बाबर-रिझवानवर सडकून टीका
टीम इंडियाने मालिकेत साधली बरोबरी –
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत संपली. पहिल्या कसोटीत हेडिंग्ले येथे भारताला पराभव पत्करावा लागला. मात्र, एजबॅस्टन येथे गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत इंग्लंडला धूळ चारली. लॉर्ड्स कसोटीत यजमानांनी बाजी मारली, तर चौथ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी सामना अनिर्णीत राखला. ओव्हल येथील शेवटच्या कसोटीत मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने विजय मिळवला.





