Yumnam Khemchand Singh : मणिपूरमधील भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदी मंगळवारी ज्येष्ठ नेते युमनाम खेमचंद सिंह (Yumnam Khemchand Singh) यांची निवड झाली. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून सिंह यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये पुन्हा लोकनियुक्त सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले. मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीला एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला आहे. ती राष्ट्रपती राजवट मागे घेण्याची औपचारिक प्रक्रिया होईल. त्यानंतर नवे सरकार स्थापन केले जाईल. त्या राज्यात मे २०२३ मध्ये वांशिक संघर्षाची ठिणगी पडून हिंसाचार उसळला. प्रदीर्घ काळ घडलेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये २६० जण मृत्युमुखी पडले. त्यामुळे चौफेर टीकेचे लक्ष्य ठरलेले भाजपचे नेते एन.बिरेन सिंह यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ मणिपूरमध्ये १३ फेब्रुवारी २०२५ यादिवशी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मणिपूरमधील स्थिती सुधारल्याने पुन्हा सरकार स्थापण्याच्या हालचाली विधानसभेत स्पष्ट बहुमत असणाऱ्या भाजपच्या गोटात सुरू झाल्या. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या निमंत्रणावरून पक्षाचे मणिपूरमधील आमदार दिल्लीत दाखल झाले. पक्षाचे केंद्रीय निरीक्षक तरूण चुघ यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. त्यामध्ये ६३ वर्षीय युमनाम खेमचंद सिंह यांची पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे तेच मुख्यमंत्री बनणार असल्याचे स्पष्ट झाले. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीही असतील. ती जबाबदारी कुकी समाजातील नेत्या नेमचा किपजेन यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. मणिपूर विधानसभेचे एकूण संख्याबळ ६० आहे. भाजपचे ३७ आमदार आहेत. त्याशिवाय, मित्रपक्षांचे ११ आमदार आहेत. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्षांकडे मिळून तीन-चतुर्थांश बहुमत आहे. नवे सरकार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचे असेल. विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ मार्च २०२७ मध्ये समाप्त होईल. त्यामुळे नव्या सरकारला कारभारासाठी वर्षभराचा अवधी मिळेल.