स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने तरुणास मारहाण; भरदिवसा ११ लाखांना घातला गंडा, जामखेड तालुक्यातील घटना

जामखेड: स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तरुणास मारहाण करून अकरा लाख रुपयांना लुटले आहे. ही घटना जामखेड तालुक्यातील कुसडगाव रस्त्यावर भरदिवसा घडली आहे. या प्रकरणी आठ ते दहा जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरदिवसा ही घटना घडल्याने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
फीर्यादी राजेंद्र दिलीप मैड (वय 35 वर्षे रा आश्वी खुर्द ता. संगमनेर जिल्हा अहिल्यानगर) यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अश्विनी (पुर्ण नाव माहीत नाही), अतुल (पुर्ण नाव माहीत नाही) व सोबतचे 8 ते 9 अनोळखी इसम आशा एकूण आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फीर्यादी राजेंद्र मैड यांना आठ ते दहा जणांनी आमच्याकडे स्वस्तात सोने आहे, ते आम्ही तुम्हाला स्वस्तात देतो असे सांगून काल बुधवार दि 14 मे 2025 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जामखेड तालुक्यातील कुसडगाव रस्त्यावरील पुलाच्या जवळ बोलवले. फीर्यादी हे त्या ठिकाणी त्यांचे काही सहकारी घेऊन पोहचले. ते सोबत स्वस्तात मिळत असलेले सोने घेण्यासाठी दहा लाख रुपये घेऊन आले होते. यानंतर यातील आठ ते दहा जणांनी फीर्यादीस मारहाण करून त्यांच्याजवळील पिशवीत असलेले रोख दहा लाख रुपये तसेच गळ्यातील सोन्याची चैन, हातातील चांदीचे कडे, मनगटी घड्याळ व मोबाईल असा एकूण 11 लाख 5 हजार रुपयांचा ऐवज लंपास करुन घटना स्थळावरून सर्वजण पळून गेले.
यानंतर फीर्यादी यांना आपली फसवणूक व लुटमार झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली. घटनास्थळी स्थळी उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली. फीर्यादी राजेंद्र मैड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला आठ ते दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. सध्या पोलीस आरोपींचा कसून शोध घेत आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर हे करीत आहेत.
कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी
जामखेड ते कुसडगाव रस्त्यावरील पुलाजवळ व तळ्याच्या खालच्या बाजूला नेहमीच रोडरोबरी व लुटमारीच्या घटना घडत आहेत. आडमार्ग असल्याने आरोपी हे या रस्त्याचा फायदा घेत या ठिकाणी लुटमार करीत असतात. त्यातच भरदिवसा ही घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी अशा घटना घडू नयेत म्हणून कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांनकडून होत आहे.





