“तुमची लेकरं चांगल्या शाळेत शिकणार.. फडफड इंग्रंजी बोलणार, विदेशात फिरणार…”; ‘या’ नेत्यानं घेतला ठाकरे बंधूंचा समाचार

Sadabhau Khot – हिंदीसक्तीचा विषय जसाजसा तापत आहे, त्या प्रमाणेच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. सत्ताधारी पक्षाकडून विरोधकांवर टीका करण्यात येत असताना भाजपसोबत असणारे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनीही खुर्चीची लढाई म्हणताना दोन्ही ठाकरे बंधूंवर निशाना साधला.
माध्यमांशी संवाद साधताना सदाभाऊ खोत म्हणाले की, प्रत्येकांचा अजेंडा ठरलेला आहे. मात्र, एक दुर्दैवाची बाब अशी आहे की, शेतकऱ्यांचा अजेंडा हा राजकारण्यांच्या दिशेने चाललेला दिसत नाही. मराठी भाषेच्या अजेंड्याचं आम्ही स्वागत करतो. मात्र, शेतकऱ्यांचा देखील अजेंडा असला पाहिजे होता. कारण पोटाची भूक माणसाला भाषा शिकवत असते आणि आमची मराठी भाषा चिरकाल टिकणार आहे. त्यामुळे सध्या मराठी भाषेवरील आक्रमण हा ढोंगीपणा आहे.
माझ्या लेकराला हिंदी आणि इंग्रजी आलं पाहिजे. कारण मला जगाबरोबर चालायचे असेल तर या दोन्ही भाषा आल्या पाहिजेत. परंतु आमच्या लेकरांना हिंदी आणि इंग्रजी आलं नाही पाहिजे. आमची लेकरं भाषेच्या दारिद्र्यात राहिली पाहिजेत. आमच्या लेकरांना जग समजता कामा नये. जग केवळ यांनाच समजता आलं पाहिजे, असे म्हणत सदाभाऊ खोत यांनी दोन्ही ठाकरेंच्या मुलांच्या शिक्षणाचा मुद्दा मांडला.
आंदोलनावर खोत म्हणाले की, जे आज आंदोलन करत आहेत, त्यांना माझा साधा प्रश्न की, तुमच्या लेकरांना इंग्रजी येतं का ? विमानात बसल्यावर तुमची मुलं इंग्रजीत बोलतात ना ? तुमची लेकरं कोणत्या मराठी शाळेत शिकलीत, त्यांची नावे आम्हाला सांगा ? या प्रश्नांची उत्तरे आम्हाला द्या. तुमच्या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे आम्ही दर्शन घेऊ. कारण तुमची लेकरं फडफड इंग्रंजी बोलणार, चांगल्या शाळेत शिकणार, इंग्रजी बोलणाऱ्या जगात जाणार, वेगवेगळे देश फिरणार आणि तुम्ही इथे सांगणार दुसरी भाषा शिकता कामा नये, असे म्हणत खोत यांनी टीका केली.
… तर पंढरीच्या वारीला या
सदाभाऊ खोत म्हणाले की, महाराष्ट्रातल्या गावखेड्यातील लोकांनी मराठी भाषा जपली म्हणून आज संत तुकोबांची आणि ज्ञानोबाची दिंडी निघाली आहे. पारंपरिक मराठी भाषेचं संगीत वाजवत वारकरी पंढरपूरकडे निघाले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर मराठी भाषा जपायची असेल तर पंढरीच्या वारीला या. मुंबईत बसायचं आणि मराठी धोक्यात आली म्हणायचंय.
खरं तर धोक्यात तुमच्या खुर्च्या आल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मराठी धोक्यात आलेली नाही. ही लढाई खुर्चीची आहे. परंतु लाखो लोक दिंडीत सहभागी होऊन मराठी वाढवत आहेत, तुम्ही काय वाढवत आहात? असा प्रश्न उपस्थित करत सदाभाऊ खोत यांनी दोन्ही ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली.





