Year Ender 2024 : कुणाच्या कानाखाली मारली तर, कुणाच्या घरावर झाला गोळीबार; २०२४ मध्ये ‘हे’ सेलिब्रिटी राहिले चांगलेच चर्चेत !

Year Ender 2024 – इतर अन्य क्षेत्रांप्रमाणे २०२४ हे वर्ष एन्टरटन्मेंट इंडस्ट्रीतील अर्थात मनोरंजन उद्योग क्षेत्रातील काही बऱ्या वाईट घटनांमुळे चर्चेत राहीले. या क्षेत्रातील बऱ्याच बातम्या माध्यमांमध्ये झळकत राहील्या आणि त्याची चर्चाही होत राहीली. कोणाचा घटस्फोट तर कोणाचा वाद तर कोणाला पोलीस ठाण्यात लावी लागलेली हजेरी यामुळे काही स्टार अडचणीत आले. अश्याच काही घटनांवर आपण एक नजर टाकुयात…
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन घटस्फोट :

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चेत होते. दोघांमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. ते घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत याच्या लग्नातही दोघेही वेगळे पोहोचले होते. येथून त्यांच्या नात्यातील अडचणीच्या बातम्या पसरल्या आणि या बातम्या बराच काळ व्हायरल झाल्या.
मात्र, यावर अभिषेकने एकदा प्रतिक्रिया देत आपली अंगठी दाखवत आपण अद्याप विवाहित असल्याचे सांगितले. काही काळापूर्वी मुलगी आराध्याच्या वार्षिक समारंभातही ते एकत्र दिसले होते आणि घटस्फोट आणि मतभेदाच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला होता.
पूनम पांडेने मृत्यूची खोटी बातमी पसरवली :

पूनम पांडे फेब्रुवारी 2024 मध्ये चर्चेत होती. तिने तिच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवली. तिच्या मॅनेजरने पोस्ट केले की, पूनमचा मृत्यू गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे झाला. पण हा मार्केटिंगचा स्टंट होता. पूनमने स्वतः नंतर व्हिडिओ शेअर केला आणि सांगितले की तिला गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करायची होती, म्हणूनच तिने हे केले. तथापि, तिच्या असे करण्यामुळे तिला प्रखर टीकेचा सामना करावा लागला.
कंगना राणौतला थप्पड :

मंडी लोकसभा निवडणुकीत कंगना राणौत जिंकली तेव्हा विजयानंतर ती दिल्लीला जात होती. ती चंदिगड विमानतळावर पोहोचली तेव्हा तिला सीआयएसएफच्या माहिला गार्डने थप्पड मारली. यानंतर कंगनाने सोशल मीडियावर या घटनेबद्दल बोलले आणि व्हिडिओ शेअर केला. कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या विधानामुळे तिच्याबद्दल आपल्या मनात रोष होता असे नंतर तिला थप्पड मारणाऱ्या गार्डने कबुल केले.
सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार :

एप्रिल 2024 मध्ये सलमान खानच्या घर गॅलेक्सी बाहेर दोन लोकांनी गोळीबार केला होता. सलमान खानलाही अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. लॉरेन्स बिश्नोई टोळीने त्याच्या घराबाहेर गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. त्यानंतर सलमान सातत्याने बिश्नोई टोळीच्या रडारवर असल्याच्या बातम्या सुरू होत्या व त्यामुळे सलमान आणि त्याचे कुटुंबीय एका भीतीखाली वावरत असल्याचेही बोलले गेले.
अल्लू अर्जुनला अटक :

अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 हा चित्रपट सध्या थिएटरमध्ये आहे. या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी चेंगराचेंगरी झाली आणि एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक केली होती. त्याची जामिनावर सुटका झाली आहे. पोलीस तपास करत आहेत, प्रकरण न्यायालयात आहे.
नयनतारा-धनुष वाद :

नयनतारा आणि धनुषमध्ये 3 सेकंदाच्या क्लिपवरून वाद झाला होता. नयनताराने तिच्या नयनतारा: बियॉन्ड द फेयरी टेल या माहितीपटात धनुषच्या ननुम राउडी धन चित्रपटातील गाणी आणि दृश्ये वापरली होती. या चित्रपटात नयनताराही होती. प्रकरण अशा टप्प्यावर पोहोचले होते की, धनुषने अभिनेत्रीला कायदेशीर नोटीसही बजावून 10 कोटी रुपयांची मागणी केली होती.





