Missing Girls : यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातून सहा महिन्यांत तब्बल ३४ आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या मुलींची मानवी तस्करी होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (Missing Girls) या प्रकरणात एका मुलगी आणि तिच्या प्रियकरातील कथित ऑडिओ क्लिप समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. या संभाषणातून तस्करी कशी केली जाते, याबाबत धक्कादायक माहिती समोर येत असल्याचं सांगितलं जात आहे. राळेगावमधील मजहर कुरेशी हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफ्फुल चव्हाण यांनी या प्रकरणी गंभीर आरोप करत अल्पवयीन मुलींना परराज्यात विकले जात असल्याचा दावा केला आहे. देहव्यापार आणि मानवी तस्करीसारखे प्रकार सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Missing Girls) दरम्यान, या आरोपांची दखल घेत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी तातडीने पोलीस अधिकाऱ्यांशी बैठक घेतली. त्यांनी पोलीस अधीक्षकांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून, वेगाने तपास करण्याच्या सूचना केल्या आहेत. (Missing Girls) तथापि, मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतरही अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेऊन सोडण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. नंतर तो तेलंगणाकडे पळून जात असताना पुन्हा पकडण्यात आल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात काही पोलिसांनी आरोपीला मदत केल्याचा आरोप होत असून, संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात ‘लव्ह जिहाद’ किंवा धर्मांतराचा अँगलही असू शकतो, याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणात पुढील तपासातून नेमके काय उघड होते आणि प्रशासन कोणती ठोस कारवाई करते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. (Missing Girls)