WTC 2023-25 : द.आफ्रिका अव्वल तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी, अशात टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण…

WTC Final 2025 Qualification For India : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम फेरीत पोहचण्याची टीम इंडियाची वाट अतिशय खडतर झालेली आहे. सध्या, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. तर टीम इंडिया तिसऱ्या क्रमाकांवर आहे. दक्षिण आफ्रिकेने अलीकडेच घरच्या भूमीवर 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेचा व्हाईटवॉश केला होता, त्यानंतर त्यांनी गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले तर ऑस्ट्रेलियाविरूध्दच्या दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर घसरला.
आफ्रिका अव्वल स्थानी पोहोचल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. इथून आफ्रिकेला फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्ध आगामी 2 कसोटी सामन्यांची मालिका घरच्या भूमीवर खेळायची आहे. अशा स्थितीत आफ्रिका पाकिस्तानला एका सामन्यात सहज पराभूत करेल, असे मानले जात आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पाच कसोटी सामन्यांपैकी सुमारे तीन विजयांची आवश्यकता असेल. चला तर मग जाणून घेऊया की, अशा परिस्थितीत टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये कशाप्रकारे स्थान मिळवू शकते किंवा भारतीय संघाची फायनलमध्ये पोहचण्याची किती शक्यता आहे.
भारतासाठी अंतिम फेरीत पोहचण्याचे समीकरण…
भारतीय संघाने गेल्या 5 पैकी 4 कसोटी गमावल्या आहेत. सध्या टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. इथून टीम इंडियाला इतर संघांच्या निकालावर अवलंबून न राहता अंतिम फेरी गाठण्यासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित तीन कसोटींमध्ये किमान दोन विजय मिळवावे लागतील. याशिवाय त्यांना एक कसोटी ड्रॉ करावी लागेल. या स्थितीत ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेविरुद्धचा 2-0 असा विजयही भारतासाठी त्रासदायक ठरणार नाही. जर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित तिन्ही कसोटी भारताने जिंकल्या तर फायनलमधील स्थान विना अडथळा निश्चित होईल.
जर टीम इंडियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2-1 ने संपवली तर ऑस्ट्रेलिया पुढील मालिकेत श्रीलंकेला 2-0 ने पराभूत करून पुढे राहू शकेल. आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा निकाल काय लागतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
जर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2-2 ने संपली आणि ऑस्ट्रेलिया-श्रीलंका दोन्ही कसोटी अनिर्णित राहिल्या, तर भारत आणि ऑस्ट्रेलिया 55.26% गुणांच्या टक्केवारीसह बरोबरीत राहतील. या स्थितीत टीम इंडिया अंतिम फेरीत जाईल कारण, ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त कसोटी मालिका विजय हे भारताचेच असतील.
IND vs AUS 2nd Test : विजयानंतरही ऑस्ट्रेलियाचे टॉप ऑर्डरचे सर्व फलंदाज दडपणाखाली – वॉर्नर
याशिवाय बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचा 1-2/1-3/1-4 असा पराभव झाला तर त्यांचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्न पूर्णतः भंगणार आहे. अशा परिस्थितीत कोणते संघ अंतिम फेरीत धडक मारतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. शक्यतो द.आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया हे अंतिम फेरीत असतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.





