Women Asia Cup : आशिया चषकाच्या फायनलमध्ये रंगणार IND vs PAK महासंग्राम? फक्त ‘हा’ एकच अडथळा; आज होणार निर्णय
Women Asia Cup : भारतीय संघ फायनलमध्ये पोहोचला असून पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील विजेता भारताशी भिडेल.

Women Asia Cup 2026 Final IND vs PAK Or SL Harmanpreet Kaur : महिला आशिया चषक २०२६ (Women’s Asia Cup 2026) स्पर्धेच्या विजेतेपदाच्या लढतीचा मंच आता जवळपास सज्ज झाला आहे. अंतिम फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज महामुकाबला रंगण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय संघाने आधीच दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला असून, आता केवळ एका सामन्याचा निकाल बाकी आहे. आज संध्याकाळपर्यंत विजेतेपदाच्या शर्यतीत असणाऱ्या दोनपैकी एक संघ बाहेर पडेल आणि महाअंतिम फेरीत भारतासमोर कोण उभे ठाकणार, याचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल.
भारताने बांगलादेशला लोळवले; सहाव्यांदा गाठली आशिया चषक फायनल –
कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्या उपांत्य सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले. भारताने आतापर्यंत सहाव्यांदा आशिया चषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. यापूर्वी झालेल्या पाच अंतिम सामन्यांपैकी भारताने तीन वेळा (२०१२, २०१६ आणि २०२२) विजेतेपदावर नाव कोरले आहे, तर २०१८ आणि २०२४ मध्ये भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदा भारतीय संघ चौथ्यांदा ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज दिसत आहे.
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका आज लढत; भारत-पाक फायनलमध्ये ‘हा’ एकच अडथळा –
The defending champions face familiar rivals Pakistan for a spot in the Grand Finale 🇱🇰🇵🇰
𝐖𝐡𝐨 𝐰𝐢𝐥𝐥 𝐣𝐨𝐢𝐧 𝐈𝐧𝐝𝐢𝐚 𝐨𝐧 𝐒𝐮𝐧𝐝𝐚𝐲? 👀#DPWorldWomensAsiaCup2026 #SLWvPAKW #ACC pic.twitter.com/4RajtQWZ9i
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 11, 2026
दुसऱ्या उपांत्य फेरीत आज पाकिस्तानचा सामना यजमान श्रीलंकेविरुद्ध होत आहे. साखळी फेरीत भारताकडून मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यानंतरही पाकिस्तानने उपांत्य फेरीत मजल मारली आहे. आजच्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवल्यास क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान असा बहुप्रतिक्षित अंतिम सामना पाहायला मिळेल. मात्र, श्रीलंकेने बाजी मारल्यास पाकिस्तानचा गाशा गुंडाळला जाईल आणि भारताचा सामना श्रीलंकेशी होईल. त्यामुळे भारत-पाक फायनलच्या स्वप्नात श्रीलंका हा एकमेव अडथळा ठरत आहे.
टीम इंडिया विजयरथावर स्वार; आणखी एका विजेतेपदापासून अवघे एक पाऊल दूर –
𝐎𝐧𝐞 𝐬𝐭𝐞𝐩 𝐚𝐰𝐚𝐲 𝐟𝐫𝐨𝐦 𝐫𝐞𝐜𝐥𝐚𝐢𝐦𝐢𝐧𝐠 𝐭𝐡𝐞 𝐜𝐫𝐨𝐰𝐧 👑🇮🇳#DPWorldWomensAsiaCup2026 #INDWvBANW #ACC pic.twitter.com/FMEO3LQaQ1
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) September 10, 2026
सध्याच्या मोसमात भारतीय महिला संघाने प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. साखळी फेरीपासून उपांत्य फेरीपर्यंत सर्व सामने भारताने अत्यंत एकतर्फी जिंकले आहेत. खेळाडूंचा फॉर्म आणि आत्मविश्वास पाहता अंतिम फेरीत समोर पाकिस्तान असो वा श्रीलंका, भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. ऐतिहासिक जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भारताला आता केवळ एका विजयाची आवश्यकता आहे.





