Sunil Tatkare : जयंत पाटील येणार? ‘एकदा दोनदा चर्चा झाली पण…’, सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

Sunil Tatkare : काही दिवसांपूर्वी पुण्यात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड भेट झाली होती. दोघांमध्ये तब्बल ३० मिनिटे चर्चा झाली होती. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात होते.
या सर्व घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘पोटातले पाणी हलू न देणे ही जयंत पाटील यांची खासियत आहे’, असंसुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे?
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, जयंत पाटील येणार हे कोणी सांगितलं? १९९० पासून ते प्रबळपणे काम करत आहेत. त्यांच्या मनातील फारसं कोणाला कधी कळलं नाही. विधिमंडळात आमची सहज भेट झाली होती. दीर्घकाळ आमचा राजकीय प्रवास सोबत झाल्यामुळे मैत्री आहे. एकदा दोनदा चर्चा झाली. पण, ती चर्चा वेगळी कुठली झाली नाही, असं सुनील तटकरे म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, पोटातले पाणी हलू न देणे ही जयंत पाटील यांची खासियत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील काही वाचता येणार नाही हे मात्र नक्की आहे. शेवटी ते एका राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, जयंत पाटील नेहमीच अॅक्टीव्ह असतात, असंही सुनील तटकरे यांनी यावेळी म्हटलं आहे.
सुनील तटकरे म्हणाले, आमची पुढची वाटचाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात चालली आहे. कुटुंब म्हणून मी भाष्य करणार नाही. मी राजकीय भूमिका मांडू शकतो, कौटुंबिक नातं कौटुंबिक असतं. मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जाऊ ही आमची राजकीय भूमिका आहे, असंही सुनील तटकरे यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं.





