Shiv Sena Leader : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? शिवसेना नेत्याच्या विधानाने रंगली चर्चा, नेमकं काय म्हणाले ?
Shiv Sena Leader : शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर चांदूरबाजार येथील एका जाहीर सभेत बोलताना शिवसेना नेते बच्चू कडूंनी एक मोठं विधान केले आहे.

Shiv Sena Leader : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. पक्षात सामील होताच त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांनी आपला अर्जही दाखल केला. बच्चू कडूंना विधानपरिषदेची उमेदवारी मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार येथे भव्य जल्लोष सभा पार पडली.
या सभेत बोलताना बच्चू कडू आक्रमक भूमिकेत दिसले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यशैलीचे जोरदार कौतुक करत, “जनतेच्या प्रश्नांसाठी रात्री 2 वाजताही दरवाजा उघडा ठेवणारा नेता म्हणजे शिंदे. अनेक मुख्यमंत्री पाहिले, पण मदतीसाठी तत्पर असणारा असा नेता प्रथमच पाहिला,” असे सांगितले. तसेच, दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय शिंदेंनी घेतल्याचा उल्लेख करत, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बच्चू कडूंचं मोठं विधान
यावेळी बच्चू कडूंनी शिंदे सरकारच्या कामगिरीचाही गौरव केला. “देशातील अनेक राज्यांना जे शक्य झाले नाही, ते शिंदेंनी करून दाखवले. त्यांनी जात-पात न पाहता माणुसकीला प्राधान्य दिले.” शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतही शिंदेंचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. “भगवा आम्ही सत्तेसाठी नव्हे, तर तत्त्वासाठी उचलला आहे. जनतेसाठी रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या नेत्यालाच आम्ही स्वीकारले,” अशी भूमिका बच्चू कडूंनी स्पष्ट केली. तसेच एकनाथ शिंदेंना यांना पुन्हा मुख्यमंत्री करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असे मोठे विधानही बच्चू कडूंनी आपल्या भाषणात केले. यानंतर आता राज्याच्या पलटवार विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर बच्चू कडूंनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयाकडे राजकीय पुनर्वसन म्हणून पाहिले जात आहे. विधान परिषद उमेदवारी आणि विदर्भातील त्यांचा प्रभाव लक्षात घेता, महायुतीला याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, प्रहार जनशक्ती संघटना पुढे सामाजिक स्तरावर काम करेल, तर राजकीय कार्यासाठी ते आणि त्यांचे समर्थक शिवसेना शिंदे गटात सक्रिय राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : Sanjay Raut : नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीच्या शिक्षेची मागणी; संजय राऊत म्हणाले…






