Bachu Kadu : सध्या दिवाळी सण सुरू असून राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर टीकेचे फटाके फोडताना दिसत आहेत. दिवाळीनंतर होऊ घातलेल्या स्थानिक निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी केली जात असून, दुसरीकडे आरोपांची फैरी सुरू आहेत. अमरावतीतही राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहेत. नुकतेच रवी राणा आणि नवनीत राणा यांनी राजकीय फटाके फोडले आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाषा करताना राणा पती पत्नीने टीका केली होती. या टीकेवर प्रहारचे नेते माजी मंत्री बच्चू कडू यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. तुम्हीच गटार गंगेत उभे आहेत आणि तुम्ही राज आणि उद्धव ठाकरेंवर टीका करत आहात. भाजप बायकोमध्ये आणि नवरा युवा स्वाभिमानमध्ये हे कशासाठी याचे स्पष्टीकरण आधी तुम्ही द्या, असा सवाल बच्चू कडू यांनी केला आहे. राणा एवढं नौटंकी जोडपं तर देशात पाहायला मिळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. खोचक टोला पुढे ते म्हणाले, असं कुठे आहे का बायको भाजपात आणि नवरा स्वाभिमान संघटनेत. याची बायको याच्या संघटनेत राहू शकत नाही या एवढी नाचक्की यांच्यावर येत असेल तर अधिक काय बोलावे असा, खोचक टोलाही बच्चू कडूंनी राणा दाम्पत्याला लगावला आहे. तसेच बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर टीका करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांवर देखील गंभीर आरोप केला आहे. तुम्हाला वरून कार्यक्रमाला आहे. वरून देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रम दिला आणि तुम्ही बोलायला लागले दोघेजण, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. हे राणा दाम्पत्य शेतकरी विरोधात आहे. एकदा पूर्ण हिशोब करावाच लागेल आंदोलन झाल्यावर पाहू, अशा कडक शब्दांत कडूंनी राणा दाम्पत्याला इशारा दिला आहे. त्यामुळे आता यावर राणा दाम्पत्य काय प्रतिक्रया देणार हे पाहावे लागणार आहे. हेही वाचा : “राज ठाकरे सोडाच, उद्धवजींसोबतही लढणार नाही”, भाई जगतापांचे BMC निवडणुकीबाबत मोठं विधान