Supriya Sule : विशेष अधिवेशनाच्या मागणीवर शरद पवार गटाची सही का नाही? सुप्रिया सुळेंचा स्पष्ट खुलासा

नवी दिल्ली : पाकिस्तानातील दहशतवादी हल्ल्यानंतर विरोधकांकडून विशेष संसदीय अधिवेशनाची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या मागणीवर शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (एनसीपी) सही नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली असून यामागचं खऱं कारण सांगितलं आहे.
सुप्रिया सुळे परदेश दौऱ्यावर असताना काँग्रेसकडून त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. यासंदर्भात त्या म्हणाल्या, “मी परदेशात प्रतिनिधीमंडळासोबत होते. त्या काळात काँग्रेसने विशेष अधिवेशनासाठी पाठवलेल्या पत्रावर सह्याबाबत माझ्याशी चर्चा केली. मात्र मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की, मी सध्या देशाबाहेर असल्यामुळे सह्या करण्यासाठी उपस्थित राहू शकत नाही. तसेच मी परत आल्यावरच निर्णय घेऊ शकते, हेही त्यांना सांगितलं होतं. मात्र, मी परत येण्यापूर्वीच पत्र पाठवण्यात आलं.”
‘हे तुच्छ राजकारण करण्याची वेळ नाही’ – सुप्रिया सुळे
पत्रावर शरद पवार गटाची सही नसण्यामागे आणखी एक स्पष्ट कारण सुप्रिया सुळे यांनी दिलं. “शरद पवार साहेबांनी आधीच स्पष्ट केलं आहे की, देशाविरोधात सुरू असलेलं ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत आमचा पक्ष सरकारसोबत खंबीरपणे उभा राहील. अशा संवेदनशील वेळी आम्ही सरकारविरोधात एकही शब्द बोलणार नाही. सध्या तुच्छ राजकारण करण्याचा काळ नाही, तर देश एकत्र येण्याची गरज आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
‘पावसाळी अधिवेशनात विचारू सरकारला प्रश्न’
सुळे यांनी असंही स्पष्ट केलं की, सध्या सरकारकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानविरोधात योग्य भूमिका घेतली जात आहे. सरकारने इतर देशांना आणि परदेशी माध्यमांना माहिती दिली आहे. मात्र, भारतीय संसद आणि लोकप्रतिनिधींना अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, हे योग्य नाही. “पावसाळी अधिवेशनात आम्ही सरकारला निश्चितपणे प्रश्न विचारू, पण आत्ता देशाची एकजूट दर्शवणं आवश्यक आहे,” असं त्या म्हणाल्या.
काँग्रेससह १६ पक्षांनी मागणी केली होती
या आठवड्याच्या सुरुवातीला काँग्रेसच्या नेतृत्वाखालील १६ विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. या पत्रात जम्मू-कश्मीरमधील पूँछ, उरी आणि राजौरी भागांतील दहशतवादी हल्ल्यांचा, नागरिकांच्या हत्यांचा आणि भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवरील परिणामांचा उल्लेख करण्यात आला होता.
मात्र, या पत्रावर शरद पवार गटाची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. यावर सुप्रिया सुळे यांनी दिलेला हा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिका अधिक स्पष्ट करतो आहे. सध्या देशाच्या सुरक्षेसाठी सरकारसोबत उभं राहणं हेच योग्य असल्याचं मत त्यांनी पुन्हा एकदा मांडलं.





