Sanjay Raut : डीजे, लेझरबाबत कारवाई करण्यास फडणवीस का घाबरत आहेत? संजय राऊत यांचा थेट सवाल
केवळ काही शहरांमध्ये घातलेली बंदी अपुरी आहे, कारण हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे. कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर गृह विभागाची कोणतीही भूमिका नाही, असे त्यांनी सांगितले.

Sanjay Raut – राज्य सरकारने सणासुदीच्या काळात उच्च क्षमतेच्या (हाय-डेसिबल) डीजे साऊंड सिस्टिम्स आणि लेझर लाइट्सच्या वापराबाबत धोरण निश्चित केले पाहिजे, असे शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी म्हटले. तसेच, या मुद्द्यावर कारवाई करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नाही, असा आरोपही त्यांनी केला.
पुण्यात मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टिम्सला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्य सरकारवर टीका करताना राऊत म्हणाले, केवळ काही शहरांमध्ये घातलेली बंदी अपुरी आहे, कारण हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित आहे. कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर गृह विभागाची कोणतीही भूमिका नाही, असे त्यांनी सांगितले.
विद्यानंद बापट हे कार्यकर्ते सणासुदीच्या काळात डीजे आणि लाऊडस्पीकरच्या वापरांविरुद्ध आवाज उठवत होते आणि गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषणाविरुद्ध मोहीम राबवत होते. गुरुवारी पुण्यात टिळक रोडवर माध्यमांशी बोलत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
हा हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. नागपूर पोलिसांनी गुरुवारी आगामी सणासुदीच्या काळात उच्च क्षमतेच्या साऊंड सिस्टिम्स तसेच बीम्स आणि लेझर लाइट्सच्या वापरावर बंदी घालणारा आदेश जारी केला.
हा धोरणात्मक निर्णय आहे आणि तो केवळ एका शहरापुरता घेता येणार नाही. मग तो डीजेचा वापर असो किंवा लेझर लाइट्सचा, ज्यामुळे लोकांचे मानसिक आणि शारीरिक नुकसान होते. या मुद्द्यावर धोरणात्मक निर्णय घेण्याचे धाडस गृहमंत्र्यांमध्ये नाही, असे राऊत म्हणाले.
पुण्यात गणेशोत्सवादरम्यान डीजे सिस्टिमच्या विरोधात हजारो लोक एकत्र आले होते आणि नागपूर व इतर शहरांमध्येही अशाच मागण्या करण्यात आल्या होत्या. जर सरकार लोकांच्या भावनांचा आदर करत असेल, तर लोकांच्या इच्छेनुसार कारवाई करण्यास ते का घाबरत आहे? असा सवाल त्यांनी केला. तसेच, पुण्यातील हल्ला हा देशातील कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचे लक्षण असल्याचे त्यांनी म्हटले.






