Monsoon Health: पावसाळ्यात पचन का बिघडते? तज्ज्ञांनी सांगितली कारणे आणि पोट निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
Monsoon Health गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजी विभागातील वरिष्ठ तज्ज्ञ यांच्या मते, पावसाळ्यात अनेकांना आपली पचनशक्ती अचानक कमी झाल्यासारखी वाटते. प्रत्यक्षात पोट कायमचे कमकुवत होत नाही. मात्र, या ऋतूमध्ये अन्न पचण्याचा वेग काहीसा कमी होतो. त्याचबरोबर पोटाच्या संसर्गाचा धोका वाढत असल्याने अपचनाच्या समस्या अधिक जाणवतात.

Monsoon Health: पावसाळा सुरू झाला की वातावरण आल्हाददायक होते. थंड हवा, रिमझिम पाऊस आणि गरमागरम भजी, चहा यांचा आनंद घेण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. मात्र, हा ऋतू जितका आनंददायी असतो तितकाच तो आरोग्यासाठी आव्हानात्मकही ठरू शकतो. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांसोबतच पोटाच्या तक्रारीही या काळात वाढतात. अनेकांना अपचन, गॅस, पोट फुगणे, अॅसिडिटी, जुलाब किंवा उलट्यांचा त्रास जाणवतो. त्यामुळे पावसाळ्यात पचनशक्ती का कमी होते आणि त्यापासून बचावासाठी काय करावे, याबाबत तज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. (Monsoon Health)
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजी विभागातील वरिष्ठ तज्ज्ञ यांच्या मते, पावसाळ्यात अनेकांना आपली पचनशक्ती अचानक कमी झाल्यासारखी वाटते. प्रत्यक्षात पोट कायमचे कमकुवत होत नाही. मात्र, या ऋतूमध्ये अन्न पचण्याचा वेग काहीसा कमी होतो. त्याचबरोबर पोटाच्या संसर्गाचा धोका वाढत असल्याने अपचनाच्या समस्या अधिक जाणवतात. (Monsoon Health)
तज्ज्ञांच्या मते, यामागचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे हवेत वाढलेली आर्द्रता. पावसाळ्यात वातावरणात ओलावा जास्त असल्याने शरीराची कार्यक्षमता काही प्रमाणात मंदावते. त्याचा परिणाम पचनसंस्थेवरही होतो. त्यामुळे नेहमीचेच अन्न खाल्ले तरी ते पचायला अधिक वेळ लागू शकतो. यामुळे पोट जड वाटणे, गॅस होणे, पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा अस्वस्थता जाणवणे अशा तक्रारी वाढतात. (Monsoon Health)

Weak digestion
याशिवाय पावसाळ्यात तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाण्याचे प्रमाणही वाढते. गरम चहासोबत भजी, वडे, समोसे, कचोरी, चाट किंवा इतर जंक फूड खाण्याकडे अनेकांचा कल असतो. हे पदार्थ आधीच पचायला जड असतात. त्यामुळे अॅसिडिटी, अपचन आणि अॅसिड रिफ्लक्सचा त्रास वाढू शकतो. अॅसिड रिफ्लक्समध्ये पोटातील आम्ल अन्ननलिकेत वर येते आणि छातीत किंवा घशात जळजळ होऊ शकते. (Monsoon Health)
पावसाळ्यात पोटाच्या संसर्गाचा धोका वाढण्यामागे अस्वच्छताही मोठे कारण ठरते. पावसाचे पाणी आणि ठिकठिकाणी साचलेले पाणी यामुळे पिण्याचे पाणी किंवा अन्न दूषित होण्याची शक्यता वाढते. अशा पाण्यात जीवाणू, विषाणू आणि परजीवी वाढू शकतात. हे सूक्ष्मजंतू शरीरात गेल्यास पोटाचा संसर्ग होऊ शकतो. तसेच फळे आणि भाज्याही दूषित पाण्याच्या संपर्कात येऊ शकतात. बाहेर बराच वेळ ठेवलेले किंवा स्वच्छतेची काळजी न घेता बनवलेले अन्न या दमट वातावरणात लवकर खराब होते. त्यामुळे फूड पॉइझनिंग, जुलाब, उलट्या, पोटदुखी आणि पोटात मुरडा येण्याच्या समस्या वाढू शकतात. (Monsoon Health)
तज्ज्ञांच्या मते, या काळात घाबरण्याची गरज नाही. पोट कायमचे कमकुवत होत नाही, मात्र त्यावर अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे काही साध्या सवयी अंगीकारल्यास या समस्या टाळता येऊ शकतात. शक्यतो नेहमी ताजे आणि घरचे बनवलेले हलके अन्न खावे. उघड्यावर मिळणारे अन्न, जास्त तेलकट किंवा मसालेदार पदार्थ टाळावेत. फळे आणि भाज्या स्वच्छ धुवूनच खाव्यात. पिण्यासाठी नेहमी स्वच्छ किंवा उकळून थंड केलेले पाणी वापरावे. तसेच वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे आणि हात स्वच्छ धुण्याची सवय ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
योग्य आहार, स्वच्छता आणि पुरेसे पाणी यामुळे पावसाळ्यातही पचनसंस्था निरोगी राहू शकते. त्यामुळे या ऋतूचा आनंद घेतानाच आरोग्याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे.





