Nashik politics : नाशिकचं राजकारण पुन्हा तापणार? ध्वजारोहणाचा मान कुणाला? भुजबळ, महाजन की भुसे, पालकमंत्रिपदाचा तिढा कायम

नाशिक : नाशिकच्या राजकारणात पुन्हा एकदा खलबतं सुरू झाली आहे. यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याचा मान कोणाला मिळणार, यावरून महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात तणाव वाढला आहे. यासोबतच, नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा रखडलेला तिढा आणि २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीने हा वाद अधिकच पेटला आहे.
छगन भुजबळ, गिरीश महाजन आणि दादा भुसे या तीन दिग्गज नेत्यांमधील अघोषित शर्यत आणि माणिकराव कोकाटे यांचा दाव्याने नाशिकच्या राजकीय वातावरणात नवी रंगत आली आहे.
स्वातंत्र्यदिनाचा ध्वजारोहण सोहळा हा नाशिकमध्ये राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. शासकीय नियमानुसार, हा मान जिल्हाधिकारी किंवा पालकमंत्र्यांपैकी एकाला मिळतो. मात्र, नाशिकला अद्याप पालकमंत्री नियुक्त न झाल्याने यंदाचा ध्वजारोहण सोहळा कोणाच्या हाती जाणार, याबाबत उत्सुकता आहे.
मागील प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी २०२५) आणि महाराष्ट्र दिनाच्या (१ मे २०२५) ध्वजारोहणाची जबाबदारी भाजपचे गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली होती. यामुळे यंदाही महाजन यांनाच हा मान मिळेल की भुजबळ किंवा भुसे यांना संधी मिळेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पालकमंत्रिपदाचा वाद काय?
नाशिकमध्ये २०२६-२७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा हा जागतिक पातळीवरील महत्त्वाचा धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळा आहे. या कुंभमेळ्यासाठी ७,००० कोटींहून अधिक रकमेच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचे नियोजन आहे, ज्यामुळे पालकमंत्रिपदाची जबाबदारी अधिकच महत्त्वाची बनली आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पदासाठी आग्रही आहेत. नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा जागांपैकी राष्ट्रवादीच्या ७, भाजपच्या ५ आणि शिवसेनेच्या २ जागा आहेत, तर एक जागा AIMIM ने जिंकली आहे.
१८ जानेवारी २०२५ रोजी राज्य सरकारने गिरीश महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री म्हणून जाहीर केले होते, परंतु शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नाराजीनंतर १९ जानेवारीला हा निर्णय स्थगित करण्यात आला. सध्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे, ज्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बैठका आणि विकासकामे रखडली आहेत.





