Ambadas Danve : मुलांच्या तोंडचा तांदूळ आफ्रिकेत कोण पाठवतंय? अंबादास दानवेंचा सरकारवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. शालेय मुलांसाठी असलेला सरकारी तांदूळ आफ्रिकेत पाठवला जात आहे. या प्रकरणी दानवे यांनी सरकारला थेट “भ्रष्टाचार पे चर्चा” करण्याचे आव्हान दिले आहे. एवढंच नाही तर जागा आणि वेळ सरकारनेच ठरवावी, असं ठणकावून सांगितलं आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात सर्वत्र आवाज उठवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अंबादास दानवे यांनी शालेय पोषण आहार योजनेतील तांदूळ गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित केला आहे. दानवे यांनी जे. व्ही. ग्रेन्स डीलर्स नावाच्या नोंदणीकृत संस्थेच्या अनिलकुमार गुप्ता यांच्यावर हा तांदूळ आफ्रिकेत निर्यात केल्याचा आरोप केला आहे.
पोषण आहार योजनेचा गैरव्यवहार
शालेय मुलांना पोषण आहार योजनेअंतर्गत पुरवला जाणारा तांदूळ हा मुलांच्या पोषणासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, दानवे यांच्या मते, हा तांदूळ गैरमार्गाने परदेशात, विशेषतः आफ्रिकेत पाठवला जात आहे. या गैरव्यवहारामुळे शालेय मुलांचा घास हिरावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
अंबादास दानवेंचे सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप
जे. वी. ग्रेन्स डीलर्स ही नोंदणीकृत संस्था सामाजिक कार्यासाठी नोंदवली गेली. पण पहा, या संस्थेला मुंबई जिल्ह्यातील तांदूळ वाहतुकीचे कंत्राट देण्यात आले. या संस्थेचे अनिलकुमार गुप्ता यांची संस्थेबाबत वृत्ती ‘वरून सज्जन, आतून चोर’ अशीच आहे. संस्थेला होणार नफा सामाजिक उपक्रमासाठी वापरण्याऐवजी तो हे महाशय स्वतःच्या फायद्यासाठी वापरात असल्याचे समोर आले आहे. हे ऑडिटच्या शेअर होल्डींगच्या नमुन्यातून सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट झाले आहे.
कारनामा १
संस्थेत ८० टक्के शेअरहोल्डर असलेले अनिलकुमार गुप्ता हेच महाशय तांदूळ वाहतुकीचे उपकंत्राटदार आहेत. यांना हे उपकंत्राट देताना नियम जात्यात दळून टाकले गेले आहेत. एवढ्यावर हे थांबत नाही. या उपक्रमांसातून येणार नफा हा थेट अनिलकुमार गुप्ता यांच्या खात्यात वळवला जात आहे. गुप्ताच तेच पुरवठ्यासाठी आवश्यक वाहनांचे मालक आहेत जी संस्थेच्या पैशातून खरेदी करण्यात आले.
कारनामा २
संस्थेला आलेला निधी हा ‘अनसिक्योर्ड लोन’ म्हणून धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता अनिलकुमार गुप्ता यांनी स्वतःच्या खात्यात वळवला आहे. संस्थेला घरगड्यासारखे वागवल्याचा हा पुरावा.
कारनामा ३
कमी भावाने हे कंत्राटदार महाशय मुंबईच्या भागात अन्नधान्याची ने आण करतात. मग उरलेले पैसे येतात कोणीकडून. ही सेवा स्वस्तात देऊन ‘प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजना’ अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी येणार तांदूळ काळ्या बाजारात तर पळवला जात नाही? हे महाशय गुप्ता, शालेय मुलांसाठी येणार तांदूळ परदेशात.. विशेषतः आफ्रिकन देशात यांनी यासाठी जाळे उभे केल्याची माझी खात्रीलायक माहिती आहे.
कारनामा ४
जे. बी. ग्रेन डीलर्सच्या वतीने कोणतेही सामाजिक काम झालेले नाही. ५-१०-२०२३ रोजी रेल्वे प्रशासनाने यांचे एक कंत्राट मुदतीपूर्वीच रद्द केले आणि डिपॉझिट जप्त केले आहे. अश्या संस्थेला आणि लोकांना कोणतेही टेंडर देता येत नाही. मग गुप्तांना हे महायुती सरकारचे लाडके लाभार्थी कसे?
या प्राकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट करून संस्थेची नोंदणी रद्द करण्यात यावी. या टेंडर घोटाळ्यात दोषी आढळणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी. अशी माझी मागणी आहे.





