राहुल गांधी यांच्या जागी उमेदवारी मिळालेले किशोरीलाल शर्मा कोण आहेत? सोनिया गांधींच्या निवडणूक प्रचारात बजावली महत्वाची भूमिका…

Amethi Congress Candidate| काँग्रेसने उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि अमेठी या दोन महत्त्वाच्या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार आहेत, तर पक्षाने सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय केएल शर्मा यांना अमेठीतून तिकीट दिले आहे. लोकसभेच्या या दोन्ही जागांवर पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून काँग्रेसकडून आजच उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
रायबरेली मतदार संघ हा दीर्घकाळापासून गांधी घराण्याचा गड राहिला आहे. प्रियंका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याच्याही चर्चा होत्या. तर प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी अनेकवेळा विधानांद्वारे सूचित केले होते की ते अमेठीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, परंतु काँग्रेसने अमेठीतून गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला पक्षाचा उमेदवार बनवले आहे. केएल शर्मा यांना तिकीट देऊन पक्ष आपल्या जुन्या परंपरांवर परतण्याचे संकेत दिले जात आहेत.
याआधीही गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीला मिळाली उमेदवारी
राजीव गांधी 1991पर्यंत येथून खासदार होते, पण त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाने सतीश शर्मा यांना उमेदवार केले. 1996 मध्ये सतीश शर्मा येथून पुन्हा निवडून आले, पण 1998 च्या निवडणुकीत त्यांचा भाजपच्या संजय सिंह यांच्याकडून पराभव झाला. 1999 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा पक्षाने सोनिया गांधींच्या उमेदवारीची घोषणा केली तेव्हा गांधी कुटुंबातील सदस्य आठ वर्षांनी अमेठीत परतले.
2004 मध्ये राहुल गांधींनी अमेठीतूनच राजकीय इनिंगला सुरुवात केली होती. राहुल यांनी आधीच निवडणूक जिंकली होती. 2019 पर्यंत राहुल येथून खासदार होते, परंतु त्या वर्षी झालेल्या निवडणुकीत त्यांचा स्मृती इराणी यांच्याकडून 55,000 मतांनी पराभव झाला होता.
कोण आहेत किशोरी लाल शर्मा अमेठीचे काँग्रेसचे उमेदवार ?
के. एल शर्मा मूळचे लुधियाना पंजाबचे आहेत. ते पहिल्यांदा 1983 मध्ये काँग्रेस कार्यकर्ता म्हणून अमेठीत आले. राजीव गांधींच्या मृत्यूनंतर त्यांनी अमेठीत काँग्रेसला भक्कम करण्यासाठी काम केले. 1999 मध्ये सोनिया गांधींच्या निवडणूक प्रचारात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. राजीव गांधींच्या काळात सरकारच्या कामाचा प्रचार करण्यासाठी त्यांना यूपीला पाठवण्यात आले आणि तेव्हापासून ते इथेच राहिले.
गेल्या पंचवीस वर्षांपासून अमेठी, रायबरेलीतील प्रचाराची धुरा गांधी कुटुंबाकडे आहे. 2004 मध्ये जेव्हा राहुल गांधींनी पहिल्यांदा अमेठीतून उमेदवारी दाखल केली होती, तेव्हा केएल शर्मा तिथे उपस्थित होते आणि आता वीस वर्षांनी ते त्याच अमेठीतून राहुल गांधी यांच्या जागी निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, अमेठीतून केएल शर्मा यांचा सामना आता भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्यासोबत होणार आहे.
हेही वाचा :





