परभणी: माहिती अधिकाराचा कायदा कडक करा म्हणून अनेक समाजसेवक ओरडत होते, आंदोलन करत होते. पण आज भाजपाने माहिती अधिकार कायदा संपवला असताना आमच्या वेळी आंदोलन करणारे समाजसेवक आता कुठे गेले? यांची दातखिळी बसलीय का? असा प्रश्न अजित पवार यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांचे नाव न घेता उपस्थित केला.
महादेवासारखा तिसरा डोळा उघडून या सरकारला आपल्याला घालवण्याची गरज आहे. निवडणुका जवळ येत आहेत. ३७० चा मुद्दा इथे काढतील. तो मुद्दा जम्मू आणि काश्मीरचा आहे. त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही भाजप सरकारला पाच वर्षांत काय केले हे विचारा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी जिंतूरच्या जाहीर सभेत केले.
राज्यकर्ते सत्तेत मश्गुल झाले आहेत. त्यांना सत्तेची मस्ती चढली आहे. तीन वर्षे कर्जमाफी या सरकारने केली होती, माझ्या काकांनी एका फटक्यात दिली होती असेही पवार यांनी सांगितले. शिवस्वराज्य यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकसभेत जे केले ते विधानसभेत करु नका असे आवाहन परभणीतील जनतेला पवार यांनी केले.
भाजपवाले कितीही नीच पातळीवर भ्रष्टाचार करु देत परंतु या शाहु फुले आंबेडकरांच्या विचारातील महाराष्ट्रातील जनता यांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. तसेच पार्टी विथ डिफरन्स म्हणणारी भाजप महाराष्ट्रात जिंकू शकत नाही हा आत्मविश्वास नाही म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नेते फोडत आहेत असा आरोपही मुंडे यांनी केला.
आज दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती मराठवाड्यात आहे मात्र हे कृत्रिम पाऊस पाडायला निघाले आहेत. याच्या फवारणीने आलेले ढगच गायब झाले आहेत असे हे देवेंद्राचे सरकार असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला.