महाराष्ट्रात CBSE पॅटर्न कसा असेल? नव्या शैक्षणिक धोरणाची A टू Z माहिती, अभ्यासक्रमापासून परीक्षेपर्यंत सर्वकाही!

CBSE Pattern In ZP School : महाराष्ट्रात CBSE पॅटर्नवर आधारित नवं शालेय शिक्षण धोरण लागू करण्याबाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर होण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्र्यांनी सर्व प्रश्नांना स्पष्ट उत्तरं देत नव्या धोरणाची सविस्तर माहिती जाहीर केली आहे. NCERT चा अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तकं आणि CBSE ची परीक्षा पद्धती राज्यात कशी राबवली जाणार, याबाबत शिक्षक आणि पालकांचे संभ्रम दूर होणार आहेत. हे नवं धोरण २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने लागू होणार असून, त्याची अंमलबजावणी चार टप्प्यांत पूर्ण होईल.
टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी –
२०२५-२६: इयत्ता १ ली
२०२६-२७: इयत्ता २ री, ३ री, ४ थी, ६ वी
२०२७-२८: इयत्ता ५ वी, ७ वी, ९ वी, ११ वी
२०२८-२९: इयत्ता ८ वी, १० वी, १२ वी
पाठ्यपुस्तकं आणि अभ्यासक्रम –
राज्य मंडळाची पाठ्यपुस्तकं बालभारतीच तयार करणार आहे. NCERT च्या पुस्तकांचा अभ्यास करून राज्याच्या गरजेनुसार बदलांसह बालभारती स्वतंत्र पाठ्यपुस्तकं बनवेल. SCERT मार्फत इयत्ता १ ली ते १० वीचा अभ्यासक्रम तयार होत असून, नव्या धोरणानुसार पहिलीच्या पुस्तकांचं काम सुरू आहे.
राज्य मंडळ बंद होणार का?
शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, महाराष्ट्राची समृद्ध शैक्षणिक परंपरा लक्षात घेता राज्य मंडळ बंद होणार नाही. CBSE पॅटर्नचा अभ्यासक्रम स्वीकारला जाईल, पण १० वी आणि १२ वीच्या परीक्षा राज्य मंडळच घेईल. पालकांवर बोर्ड निवडीचं कोणतंही बंधन नसेल.
इतिहास, भूगोल आणि मराठीचं काय?
नव्या अभ्यासक्रमात महाराष्ट्राची संस्कृती, संत, समाजसुधारक आणि ऐतिहासिक व्यक्तींना प्राधान्य असेल. इतिहास, भूगोल आणि भाषा विषयांत या बाबींचा समावेश असेल. मराठी भाषा सर्व शाळांमध्ये अनिवार्य राहील, जेणेकरून तिचा सन्मान आणि अभिजात दर्जा कायम राहील.
शैक्षणिक वेळापत्रक आणि मोफत शिक्षण –
वेळापत्रक हवामान आणि भौगोलिक परिस्थितीनुसार ठरेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळांमधील मुलांना १० वीपर्यंत आणि मुलींना १२ वीपर्यंत मोफत शिक्षण मिळेल.
शिक्षकांचं प्रशिक्षण –
नव्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांचं प्रशिक्षण सुरू आहे. ब्रिज कोर्सद्वारेही अतिरिक्त प्रशिक्षण दिलं जाईल.
CBSE पॅटर्न का?
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये कौशल्यं विकसित व्हावीत, यासाठी घोकंपट्टीऐवजी CBSE च्या सर्वंकष मूल्यमापन पद्धतीचा अवलंब केला जाईल. यात संकल्पनांवर भर, सतत मूल्यमापन (CCE), व्यावहारिक ज्ञान, स्पर्धा परीक्षांची तयारी, सॉफ्ट स्किल्स आणि दर्जेदार शिक्षणावर लक्ष असेल. हे धोरण विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.





