“इंग्रजांनी जे केलं नाही ते फडणवीसांच्या काळात सुरू”; मनोज जरांगेची मुंबईकडे कूच

Manoj Jarange | राज्यात एकीकडे गणेश उत्सवाची धूम असून दुसरीकडे जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाचा एल्गार सुरू आहे. उच्च न्यायालयाने मंगळवारी एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदान इथे आंदोलन करण्यास मनाई केली. मात्र तरीही मनोज जरांगे यांनी आंदोलन करण्यावर ठाम भूमिका घेतली आहे.
त्यानुसार आज मराठा आंदोलक अंतरवाली सराटीमध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. मस्साजोग ग्रामस्थांसह दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीकडे निघाले आहेत.
मी बलिदान द्यायला तयार – मनोज जरांगे
“इंग्रजांनी जे केलं नाही ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या काळात सुरू आहे. सणाला गालबोट लागेल, असे आम्ही कधीच पाऊल उचलु शकत नाही. फडणवीस यांना आपली चूक झाकायची आहे, त्यामुळे देवाला पुढे करत आहे. देव देवतांना पुढे करून गोरगरीब मराठा समाजाला वेठीस धरताय. काल एका तरूणाने आत्महत्या केली. ते करू नका. मराठा आणि कुणबी एक आहेत. ५८ लाख एक असून एकाने लातूरमध्ये आत्महत्याचा प्रयत्न केला. फडणवीस साहेब मराठ्यांचा संयम ढासळू देऊ नका. मुंबईमध्ये आल्यावर मला गोळ्या झाडा. मी बलिदान द्यायला तयार आहे,” असेही जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे आज २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. आंतरवाली सराटी ते मुंबई असा त्यांचा मोर्चा निघणार असून यामध्ये मोठ्यासंख्यने राज्यभरातील मराठी समाज बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहेत. त्यादृष्टीने मोठ्या मराठा आंदोलक अंतरवालीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला मनोज जरांगे पाटील यांचा लढा आता मुंबईकडे निघणार आहे. त्यांच्या या मराठा वादळाचा पहिला मुक्काम जुन्नर शहरात असणार आहे.
जालना जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत परवानगी
दुसरीकडे, मनोज जरांगे यांच्या मोर्चाला जालना जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत परवानगी दिली आहे. जालना पोलिसांकडून मनोज जरांगे यांना परवानगीसह 40 अटींचे पत्र पाठवण्यात आले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ प्रमाणे मराठा आंदोलकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
तसेच मोर्चामध्ये आक्षेपार्ह घोषणा होणार नाही याची आंदोलकांनी काळजी घ्या, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वर्तन करू नका, वाहतूक मार्गाचे पालन करा, न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना पोलिसांकडून मराठा आंदोलकांना देण्यात आल्या आहेत. Manoj Jarange |
मोर्चासाठी पोलिसांचा बंदोबस्तात तैनात
दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सकाळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. या पार्श्वभूमीवर जालना पोलिसांची तयारी देखील पूर्ण झाली असून ४५० पोलिस कर्मचारी, अधिकारी, दोन एसआरपीएफच्या कंपन्यासह बॉम्ब शोधक पथक असणार आहे. तर मनोज जारंगे पाटील यांच्या मोर्चावर पोलिसांच्या ड्रोनची नजर असणार आहे. Manoj Jarange |
हेही वाचा:





