मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा काल (दि.14) वाढदिवस साजरा झाला. त्यांना शुभेच्छा देण्याकरता त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच मुंबईतील शिवतीर्थावर मनसैनिकांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, त्यांच्या वाढदिवसादिवशी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टोला लगावला होता. आव्हाड यांनी टोल्यातूनच राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत शुभेच्छा बॅनर लावले होते. यावरून पत्रकारांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारला. त्यावर आव्हाड म्हणाले की, “भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावले आहेत, ते पाहिलं मी. ते मुख्यमंत्री व्हावेत अशी मनापासून इच्छा आहे. सध्या एकच आमदार आहेत. आता 50-60 तरी वाढवावे लागतील. त्यासाठी कृतीशील कार्य करावं लागेल, फक्त टोमणे, नकला न करता महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप काय हे महाराष्ट्राला कळलं तर जास्त बरं होईल.. याच त्यांना शुभेच्छा.!! असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. दरम्यान, आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांचा चांगलाच समाचार घेतला असल्याचं दिसून आलं आहे. यावेळी बोलताना अमेय खोपकर म्हणाले की, “महाराष्ट्र सैनिक जोपर्यंत शांत आहे तोपर्यंतच आहे उगाच भडकवू नका. जितेंद्र आव्हाड यांनी हा थिल्लरपणा बंद करावा. राज ठाकरे यांच्याबद्दल बोलल्यानंतर त्यांना चार दिवस फेम मिळतो. नागाने फणा काढल्यासारखा जितेंद्र आव्हाड यांचा चेहरा आहे. उगाच महाराष्ट्राच्या उकिरड्यावर सतत बोलत असतात. त्यांनी आता शांत राहावं अन्यथा त्यांना महाराष्ट्र सैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल’, असं खोपकर म्हणालेत. राज ठाकरेसाहेबांचा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी उत्साहाचा दिवस आहे. त्याच्यात मिठाचा खडा घालायचा यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्यासारखी विघ्नसंतोषी माणसं जन्माला आलेली आहेत. असा सणसणीत टोला अमेय खोपकर यांनी लगावला आहे.