BMC निवडणुकीसाठी भाजपचा फॉर्म्युला काय? चंद्रशेखर बावनकुळेंनी चित्र केलं स्पष्ट म्हणाले ” 51 टक्के…”

Chandrashekhar Bawankule : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील पहिला टप्पा नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया ३ डिसेंबरला पूर्ण होणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. या दोन महत्वाच्या टप्प्यांनतर तिसऱ्या आणि अत्यंत महत्वाच्या अशा महापालिका निवडणुका लागणार आहेत. मुंबई, पुणे, ठाणे यांसह सर्वच महापालिकांसाठी निवडणुका होणार आहेत. राज्य सरकारला सर्वेाच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ३१ जानेवारी या ठरवून दिलेल्या वेळेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यावा लागणार आहेत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी भाजपकडून जोरदार रणनिती आखली जात आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बड्या नेत्यांना भाजप गळाला लावत आहे. मुंबई आणि नवी मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या राजकीय उलथापालध असणाऱ्या घडामोडी घडल्या आहेत आणी आगामी काळात घडणार आहेत. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून सर्वे केला जात आहे, ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी अस्तित्वाची असणार आहे. काँग्रेसने ‘एकला चलो रेचा’ नारा दिला असल्याने ठाकरे बंधूना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. या सगळ्या घडामोडीत भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीविषयी प्रतिक्रिया देत भाजपची रणनिती काय असणार याबद्दल भाष्य केले आहे.
मुंबई आम्हालाच निवडून देईल
भाजपचा फॉर्म्युला स्पष्ट असून महायुती एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, अमित साटम तसेच अजित पवार व एकनाथ शिंदे हे सर्व नेते एकत्रित रणनीती आखत आहेत, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. तसेच डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून मुंबईची जनता मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. मुंबई आम्हालाच निवडून देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
51 टक्के मतांच्या बळावर…
मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून सर्व्हे केला जात आहे यावर बोलताना सर्व्हेबाबत सविस्तर चर्चा करणे उचित नाही, पण हे मात्र खरे की 51 टक्के मतांच्या बळावर मुंबई महानगरपालिकेत महायुतीला सत्ता मिळेल, असे मोठं विधान चंद्रशेखर बानवकुळे यांनी केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महायुती ५१ टक्क्यांच्या मते घेऊन निवडून येणार असून जास्तीत जास्त ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे देखील बावनकुळे यांनी सांगितले.
हेही वाचा : र्दैवी घटना ! चालत्या रुग्णवाहिकेला भीषण आग ; एका दिवसाच्या बाळासह चार जणांचा होरपळून मृत्यू





