Sanjay Raut : “राजकीय भांडणे आम्ही करत राहू, मात्र…”; संजय राऊतांकडून शिंदेंच्या मंत्र्याविषयी कौतुकाचे उद्गार
Sanjay Raut : रॅपिडो बाईक-टॅक्सीमुळे राज्यातील हजारो रिक्षाचालकांवर संकट आले असून, हे संकट दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.

Sanjay Raut : रॅपिडो बाईक-टॅक्सीला विरोध करण्यासाठी राज्यातील रिक्षा संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रॅपिडोच्या सेवेमुळे रिक्षाचालकांच्या रोजीरोटीवर संकट निर्माण झाल्याचा दावा रिक्षा संघटनांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर रिक्षा संघटनांच्या शिष्टमंडळाने नुकतीच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली.
या भेटीत रिक्षाचालकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली असून, सरकारकडून मार्ग काढण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी प्रताप सरनाईक यांचे कौतुक केले आहे. “राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, तो कौतुकास्पद आहे. त्यांचं अभिनंदन करतो,” असे कौतुकउद्गार संजय राऊतांनी काढले.
रॅपिडो बाईक-टॅक्सीमुळे राज्यातील हजारो रिक्षाचालकांवर संकट आले असून, हे संकट दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले की, “हजारो रिक्षाचालक जेव्हा आपल्या समस्या घेऊन राज्याच्या मंत्र्यांकडे जातात, तेव्हा त्यांच्या प्रश्नांचा सहानुभूतीने विचार होणे गरजेचे आहे. यापूर्वी रिक्षाचालकांना वाली नव्हता, मात्र परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी त्यांचे प्रश्न समजून घेतले आणि शिष्टमंडळाशी संवाद साधला.”
“राजकीय भांडणे आम्ही करत राहू. मात्र परिवहन मंत्री म्हणून त्यांनी रिक्षाचालकांचं म्हणणं ऐकून घेतलं. रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाशी त्यांनी संवाद साधला. त्यांनी उत्तम काम केलं.” रिक्षाचालकांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेण्याबाबतही संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली. बहिष्कार टाकण्यापेक्षा सरकार आणि संबंधित मंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न मांडणे अधिक योग्य असल्याचे त्यांनी सांगितले. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन आयुक्तांनी रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला असून, या चर्चेनंतर रिक्षाचालकांचे समाधान झाल्याचेही राऊतांनी सांगितले.
परिवहन मंत्र्यांचा मोठा निर्णय
दरम्यान, ॲपआधारित टॅक्सी सेवांबाबतही सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ओला, उबर, रॅपिडो आणि भारत टॅक्सी यांसारख्या ॲपआधारित टॅक्सी चालकांना आता मराठी भाषा येणे अनिवार्य करण्यात आली आहे. चालकाला परवाना घेताना चारित्र्य प्रमाणपत्र तसेच राज्यात १५ वर्षे वास्तव्य असल्याचे डोमिसाइल प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भात काल झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नव्या नियमांची माहिती दिली.






