आम्ही मुंबई भोंगेमुक्त केली.! CM फडणवीसांच्या विधानावर अनिल पाटलांचा टोला; म्हणाले, ‘पण सकाळच्या भोंग्याचे काय?’

Anil Patil | Devendra fadnavis : ‘मुंबईतील एकाही धार्मिक स्थळावर आता भोंगा नाही’, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली आहे. राज्यातील ३ ,३६७ धार्मिक स्थळांवरील भोंगे काढून टाकण्यात आले असून यापुढे ज्या भागात अनधिकृत भोंगे आढळून येतील तेथे स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकास जबाबदार धरण्यात येणार आहे. प्रत्येक पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र भरारी पथक स्थापन करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले.
धार्मिक स्थळावरील भोंगे, ध्वनिक्षेपकामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते. तसेच राज्यभरातील धार्मिक स्थळांवर भोंगे आहेत की नाही, हे तपासण्यासाठी पोलिसांच्या भरारी पथकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
धार्मिक स्थळावरील भोंग्यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबाबत न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने प्रमाणित कार्यप्रणाली(एसओपी) जाहीर केली आहे. त्यानुसार मुंबई पोलिसांनी १६०८ धार्मिक स्थळावरील भोंगे हटविले असून त्यात ११४९ मशिदी, ४८ मंदिर, १० चर्च, ४ गुरुद्वार आणि १४८ इतर धार्मिक स्थळांचा समावेश आहे. आता मुंबईतील एकाही धार्मिक स्थळावर अनधिकृत भोंगा नाही.
मुंबईबाहेर राज्यभरात १७५९ सर्व धर्मिय धार्मिक स्थळावरील भोंगे हटविण्यात आले असून याचा पूर्तता अहवालावरही न्यायालयाने समाधान व्यक्त केल्याचे फडणवीस यांनी सांगितले प्रमाणित कार्यप्रणाली(एसओपी) लागू झाल्यापासून एप्रिल व मे महिन्यात एकूण ७१ गुन्हे दाखल झाले असून ध्वनिप्रदूषणाविरुद्ध केलेल्या कारवाईवर देखरेख ठेवण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) यांची समन्वय अधिकारी म्हणून नियु्क्ती करण्यात आली आहे.
‘महाराष्ट्राने भोंग्यांबाबत मानक कार्यप्रणाली (एसओपी) तयार केली आहे. एक हजार ६०८ भोंगे हटवताना चर्चा करून, न्यायालयाचा आदेश दाखवून आणि समंजसपणे कारवाई करण्यात आली. यामुळे कुठेही धार्मिक तणाव निर्माण झाला नाही, तसेच एकही एफआयआर दाखल करण्याची गरज पडली नाही.
भोंगे हटवण्यात आलेल्या धार्मिक स्थळांमध्ये एक हजार १४९ मशिदी, ४८ मंदिरे, १० चर्च, चार गुरुद्वारे आणि १४७ इतर धार्मिक स्थळांचा समावेश आहे. मुंबईला भोंगेमुक्त करण्याचे श्रेय पोलिसांना जाते. ‘एसओपी’ची अंमलबजावणी सातत्याने सुरू आहे. पुन्हा कुठे भोंगे लावले गेले, तर संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रमुखाला जबाबदार धरले जाईल’, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
नवरात्रोत्सव, गणेशोत्सव काळात पोलिसांची परवानगी घेऊन आणि ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादा पाळूनही मंडळांना पोलीस नाहक त्रास देतात, अशी तक्रार आदित्य ठाकरे यांनी केली असता, रितसर परवानगी घेऊन तसेच नियमात उत्सव साजरे करणाऱ्या मंडळांना कोणताही त्रास होणार नाही. पोलिसांनी नाहक त्रास देऊ नये याबाबत सूचना दिल्या जातील, असेही फडणवीस यांनी सांगितले.
‘सकाळच्या भोंग्याचे काय?’
राष्ट्रवादीचे अनिल पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना उल्लेख न करता, राज्यातील भोंग्यावर कारवाई केलीत. पण सकाळच्या १० च्या भोंग्यावर कारवाई कधी करणार अशी विचारणा केली. त्यावर ध्वनिप्रदूषणाविरोधात कायदा असला तरी विचारांच्या प्रदूषणाविरोधात अजून कायदा नाही. तो कायदा झाला की विचार करू, असा टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला.





