Water Conservation: वाळवंटात फुललं नंदनवन! दुष्काळग्रस्त आणे पठारावरील ‘या’ गावाने उभा केला जलक्रांतीचा नवा आदर्श
Water Conservation: लुपीन आणि रेलफोर फाउंडेशनच्या मदतीने तब्बल १३.२५ कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण; भूजल पातळी वाढणार.

Water Conservation – जुन्नर तालुक्यातील दुष्काळग्रस्त आणे पठारावरील नळवणे गावाने लोकसहभागाच्या बळावर जलसंधारणाचा आदर्श निर्माण केला आहे. गावातील पळसठीका आणि मोरेशेत या दोन पाझर तलावांचे खोलीकरण करून तब्बल 13.25 कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण करण्यात येत असून, या कामामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाय होण्याची आशा निर्माण झाली आहे.
माजी सरपंच तुषार देशमुख यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमात ग्रामस्थांनी अभूतपूर्व एकजूट दाखवली. अवघ्या चार महिन्यांत दोन्ही तलावांमधून 4,600 ट्रक गाळ, माती आणि मुरूम काढण्यात आला. त्यामुळे तलावांची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली असून भूजलपातळी वाढण्यास, विहिरी व बोअरवेल पुनर्भरणास तसेच शेती व पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार आहे.
पळसठीका पाझर तलावाचे पाच फूट खोलीकरण करण्यात आले असून सुमारे 2.25 कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. या कामासाठी लुपीन फाउंडेशनच्या सीएसआर निधीसह ग्रामस्थांनी घरटी दोन हजार रुपयांची लोकवर्गणी देत सहभाग नोंदविला. मोरेशेत पाझर तलावाचे आठ फूट खोलीकरण करण्यात आले असून 11 कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होणार आहे.
या तलावाच्या सांडव्याची उंची दोन फूट वाढविण्यात आली असून रेलफोर फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने हे काम अंतिम टप्प्यात आहे. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तलावातून निघालेल्या माती व मुरूमाचा गावातील अंतर्गत रस्ते, विविध विकासकामे तसेच शेतकर्यांच्या शेतासाठी नियोजनबद्ध वापर करण्यात आला आहे. त्यामुळे जलसंधारणाबरोबरच गावाच्या विकासालाही चालना मिळाली आहे.
इतिहास, अध्यात्म आणि लोकसहभाग यांचा संगम असलेल्या नळवणे गावाने आता जलसंवर्धनातही नवा आदर्श घालून दिला आहे. ग्रामस्थांची एकजूट, सामाजिक संस्थांचे सहकार्य आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व यांच्या बळावर उभा राहिलेला ’नळवणे पॅटर्न’ राज्यातील जलसंधारणासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
“पाझर तलावांचे खोलीकरण हा केवळ विकासाचा प्रकल्प नाही, तर भावी पिढ्यांच्या जलसुरक्षेचा संकल्प आहे. गावातील प्रत्येक नागरिकाने या कामात सहभाग घेतला. गाव एकवटले तर कोणतेही अशक्य काम शक्य होते, हे नळवणेने कृतीतून सिद्ध केले आहे.”
– तुषार देशमुख, माजी सरपंच, नळवणे






