Walhekarwadi Protest: कचरा केंद्र आणि अनधिकृत झोपडपट्टीविरोधात नागरिक रस्त्यावर; पालिकेविरुद्ध जोरदार घोषणाबाजी
Walhekarwadi Protest: राजयोग कॉलनी परिसरातील अनधिकृत झोपड्या तातडीने हटवा; संतप्त रहिवाशांची महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी.

Walhekarwadi Protest – वाल्हेकरवाडी येथील राजयोग कॉलनी परिसरात सुरू असलेल्या कचरा वर्गीकरण (सॉर्टिंग) केंद्रामुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक समस्यांबरोबरच ओढ्यालगत वाढलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांविरोधात स्थानिक नागरिकांनी रविवारी (दि. २) सकाळी १० वाजता कचरा संकलन केंद्रासमोर तीव्र आंदोलन केले. विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन नागरिकांनी महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तातडीने कारवाईची मागणी केली.
या आंदोलनावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेवक शेखर चिंचवडे, माजी नगरसेविका पल्लवी वाल्हेकर, माजी नगरसेवक निलेश तरस आणि राजेंद्र तरस उपस्थित होते. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून ओढ्यालगत अनधिकृत झोपडपट्टी वाढत असून त्यामुळे ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित झाला आहे. पावसाळ्यात पूरस्थिती, रस्ते बंद होणे, पुलाला धोका निर्माण होणे तसेच परिसरातील सुरक्षिततेचे प्रश्न गंभीर झाले आहेत.
याबाबत महापालिका, अतिक्रमण विभाग व लोकप्रतिनिधींकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. याच परिसरात महापालिकेकडून शहरातील विविध भागांतील कचऱ्याचे वर्गीकरण केले जात असल्याने दुर्गंधी, डास-माशांचा प्रादुर्भाव, भटक्या श्वानांची वाढ आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढल्याचे नागरिकांनी सांगितले.
कचरा वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे रस्त्यांवर कचरा सांडणे, वाहतूक कोंडी होणे आणि शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच रहिवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अलीकडेच मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेनंतर तेथे कचरा नेण्यात अडचणी निर्माण झाल्याने या परिसरावरील ताण आणखी वाढल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
मात्र, या परिस्थितीचा भार स्थानिक नागरिकांवर टाकू नये, अशी ठाम भूमिका आंदोलकांनी मांडली. अनधिकृत झोपडपट्टी तातडीने हटविणे, कचरा वर्गीकरण केंद्र अन्यत्र स्थलांतरित करणे आणि परिसरातील आरोग्य व सुरक्षिततेच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा यापुढे अधिक तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला.





