Wai News – जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे दाम्पत्यांविरोधात जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चामुळे वाई शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. जिल्हा परिषदेच्या सभापती पदाच्या निवडीत सौ. ऋतुजा शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. यामुळे पक्षांतर्गत नाराजी तीव्र होत गेली आणि अखेर ती आंदोलनाच्या रूपाने बाहेर पडली. महागणपती घाट येथून सुरू झालेला मोर्चा किसनवीर चौकात पोहोचताच कार्यकर्त्यांनी विराज शिंदे व ऋतुजा शिंदे यांच्या पुतळ्याला जोड्यांनी मारून निषेध नोंदवला व दहन केले. यानंतर मोर्चा थेट विराज शिंदे यांच्या निवासस्थानाकडे वळवण्यात आला. या वेळी राजीनामा द्या, जनतेचा विश्वासघात चालणार नाही, पुन्हा निवडणूक घ्या, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी शिंदे दाम्पत्यावर थेट टीका करत संबंधितांनी नैतिकतेच्या आधारावर तात्काळ राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणात राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या विश्वासाला तडा गेल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या संपूर्ण घडामोडींमुळे वाई तालुक्यातील राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात या वादाचा राजकीय परिणाम काय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मोर्चात राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रतापराव पवार, किसनवीर सहकारी कारखान्याचे चेअरमन प्रमोद शिंदे, बाजार समितीचे सभापती मोहनराव जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव मस्कर, जि. प. सदस्य बापूसाहेब शिंदे, सदस्या सौ. वृषाली चव्हाण, शशिकांत पवार, पं. स. माजी उपसभापती अनिल जगताप, सत्यजित वीर, कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ, संजय लोळे, मदन भोसले, शिवाजीराव पिसाळ, विक्रम पिसाळ, विनायक येवले, बाजीराव महांगडे, राजेश शिंदे, संपतराव महांगडे, डॉ. नितीन कदम, भारत खामकर, प्रदीप चोरगे, सनी चव्हाण, बाळासाहेब चिरगुटे, मयूर खरात, नितीन चौरे, नितीन मांढरे, विलास मांढरे, सतीश मांढरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.