Pune : केंद्रीय पथकाच्या गाडीसमोर गावकऱ्यांचा ठिय्या; पाहणी न करताच परतत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप, महिल्या अधिकारी म्हणाल्या…

पुणेः शहरातील जीबीएस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या आजाराने पुणेकरांची चिंता वाढवली आहे. मात्र, या आजाराने घाबरुन न जाण्याचे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. सिंहगड रोड, नांदेड सिटी परिसरात या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. हा आजार दूषित पाण्यामुळे पसरत असल्याची बाब समोर आली होती.
या भागात असलेल्या विहिरीतून दूषित पाण्यामुळे या आजाराचा संसर्ग होत असल्याचे सांगितले जात होते. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत आज येथील भागात केंद्राचे ७ सदस्यांचे पथक पाहणी करण्यासाठी येथे आले होते. मात्र, गावातील नागरिकांनी त्यांच्या गाडीसमोर ठिय्या करत पाहणी करायला आला आहात आणि पाहणी न करताच चाललला आहात असा आरोप केला. तसेच अधिकाऱ्यांना गराडा घातला होता.
गावकऱ्यांनी विहिरीतील पाण्याची पाहणी करण्याची मागणी केली होती. मात्र, पाहणी न करताच हे पथक जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता. पाहणी न करताच निघालो हे कोणी ठरवले. जे काही काम होईल, त्याचे अपडेट देऊ असे या पथकाने महिला अधिकाऱ्याने सांगितले. तसेच पुण्यातील किरकिटवाडी, आंबेगाव, नांदेड गाव भागात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. या आजारावर उपयुक्त असलेल्या इंजेक्शनचा काळा बाजारा होत असल्याने पुणे महानगर पालिकेने याबाबत उपाययोजना केल्या आहेत, अशी माहिती या महिला अधिकाऱ्यानी दिली.
महापालिकेकडून सर्वेक्षणावर भर
महापालिकेच्या वतीने बाधित भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकार आबिटकर यांनी देखील येथील बाधित भागाची पाहणी केली. तसेच रुग्णालयात जाऊन रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत या भागातील नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याच्या सूचना देखील केल्या. सध्या पुणे शहरातील जीबीएस रुग्णांची संख्या ही १११ वर जाऊन पोहचली आहे.





