Vikram Misri : भारत-पाकिस्तान संघर्ष पारंपरिक कक्षेतच राहिला; परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी केले स्पष्ट

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष पारंपरिक कक्षेतच राहिला. पाकिस्तानकडून आण्विक वापराचे कुठले संकेत देण्यात आले नव्हते, अशी स्पष्टोक्ती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सोमवारी केली. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहारविषयक संसदीय समितीची बैठक झाली. त्यामध्ये मिस्त्री यांनी ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घडामोडींविषयी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षविराम घडवून आणल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने करत आहेत. त्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर मिस्त्री यांनी मोदी सरकारच्या भूमिकेचा पुनरूच्चार केला. पाकिस्तानने संघर्षावेळी चीनच्या काही बाबींचा वापर केला का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याने काही फरक पडत नाही.
कारण, पाकिस्तानी हवाई तळांवर भारताने जोरदार प्रहार केला, असे मिस्त्री उत्तरादाखल म्हणाले. भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षविराम करण्याविषयी समझोता झाला. त्याविषयीची माहिती १० मे यादिवशी मिस्त्री यांनी दिली. त्यानंतर त्यांना सोशल मीडियावरून लक्ष्य करण्यात आले. त्या ट्रोलिंगचा निषेध एकमुखाने संसदीय समितीच्या बैठकीत करण्यात आला.





