“लोकसभेच्या काळात काँग्रेसचे काही नेते रात्री गडकरींशी बोलायचे” ; विकास ठाकरेंच्या दाव्याने खळबळ

Vikas Thackeray on Nitin Gadkari । लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेसचे काही नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या फोन कॉलमुळे घरी शांत बसून राहिले होते, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी केला. काँग्रेसचे हे नेते दिवसा पक्षाचा प्रचार करायचे आणि रात्री नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधायचे, असादेखील दावा विकास ठाकरे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
विकास ठाकरे यांनी यंदा नागपूर लोकसभा मतदारसंघातून नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या लढाईत विकास ठाकरे यांचा तब्बल लाखभरापेक्षा अधिक मतांनी पराभव झाला होता. या निवडणुकीला काही महिने उलटल्यानंतर आता विकास ठाकरे यांनी काँग्रेसच्याच स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केलेत.
‘त्या’ सर्व नेत्यांची यादी आमच्याकडे… Vikas Thackeray on Nitin Gadkari ।
लोकसभा निवडणुकीत नागपुरात काँग्रेसचे काही नेते नितीन गडकरी यांच्या फोन कॉलमुळे घरी शांत बसले होते. तर काही नेते दिवसभर माझ्यासोबत फिरायचे आणि रात्री नितीन गडकरी यांच्यासोबत फोनवर बोलायचे. अशा सर्व नेत्यांची यादी आमच्याकडे असल्याचे विकास ठाकरे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत कोणी काम केले, कोणी काम केले नाही, अशा सर्वांची यादी आपल्याकडे आहे. मात्र, मी त्या सर्वांना माफ केले आहे. मात्र, आता विधानसभा निवडणुकीमध्ये माझी नजर त्या सर्वांवर राहील. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांशी जो कोणी गद्दारी करेल, त्यांना पक्षाने बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली.
फक्त सहा जणांना उमेदवारी मिळेल Vikas Thackeray on Nitin Gadkari ।
नागपुरात आम्ही सत्तर लोकांनी पक्षाची उमेदवारी मागितली असली तरी फक्त सहा जणांना उमेदवारी मिळेल. ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांच्या पाठीमागे सर्वांनी उभं राहण्याची गरज असल्याचे सांगताना विकास ठाकरे यांनी संभाव्य बंडखोरांना सक्त ताकीद ही दिली. काँग्रेस मधील जे कोणी अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे करण्याचा विचार करत आहेत, अशा नेत्यांना सांगणं आहे की त्यांनी नीट विचार करुन निर्णय घ्यावा, असा इशारा विकास ठाकरे यांनी दिला. ते नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि दिल्लीतील हायकमांड काही पावले उचलणार का, हेदेखील पाहावे लागेल.





