“सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ, राज्यात गुंडांचे राज्य” ; बाबा सिद्दीकींच्या हत्येवरून विजय वडेट्टीवार संतापले

Vijay Wadettiwar on Baba Siddique । अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाब सिद्दिकी यांची काल रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एक जण अद्याप फरार असून त्याची ओळख पोलिसांना पटल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका देखील केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर संताप व्यक्त केला आहे. याविषयी बोलताना त्यांनी, “या घटनेची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. त्यांच्या कार्यालयापुढे येऊन पोलीस संरक्षण असताना गोळी झाडली जात असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावर जर अशाप्रकारे गोळीबार होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ Vijay Wadettiwar on Baba Siddique ।
पुढे बोलताना त्यांनी,”सध्या राज्यात कायदा-सुव्यवस्थेची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, कोण सुरक्षित आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ आहे. सत्ताधाऱ्यांनी फलक लावून लोकांना सांगायला पाहिजे की, आपली सुरक्षा आपण करा,” असे असा खोचक सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.
“सत्ताधारी योजना व सत्ता मिळवण्यात व्यस्त आहे. त्यामुळे पोलिसांचे इंटेलिजन्स काम करत नाही. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिले नाही तर गुंडांचे राज्य आहे. विरोधी पक्षनेता म्हणून मी बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेतून सावरण्याची शक्ती मिळेल, अशी प्रार्थना करतो, असे देखील विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
हत्येचा तपास बिश्नोई गँगच्या अँगलने होणार Vijay Wadettiwar on Baba Siddique ।
दरम्यान, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींपैकी करनैल सिंह हा हरियाणाचा तर धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती आहे. हे तिन्ही हल्लेखोर रिक्षानं घटनास्थळी आल्याची माहिती असून या प्रकरणात चौथा व्यक्ती या तिघांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास बिश्नोई गँगप्रमाणेच एसआरए वादाच्याही अँगलने होणार असल्याची माहिती आहे.





