Tamilnadu Politics: तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या समीकरणांनी जोर धरला आहे. अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) या पक्षाने १०८ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. मात्र, बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यापासून विजय अजूनही दूर असल्याने त्यांनी आता काँग्रेसकडे पाठिंब्याची मागणी केली आहे. यावर काँग्रेस हायकमांडने उद्या महत्त्वाची बैठक बोलावली आहे. विजय यांचा सत्तास्थापनेचा दावा – विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकल्यानंतर विजय यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी विजय यांना आणखी १० आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. यासाठी त्यांनी राज्यपालांकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. काँग्रेसची भूमिका काय? काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितले की, “TVK प्रमुख विजय यांनी सरकार स्थापनेसाठी काँग्रेसचा पाठिंबा मागितला आहे. तमिळनाडूतील जनतेने भाजपविरोधी आणि धर्मनिरपेक्ष सरकारसाठी कौल दिला आहे. आम्हाला राज्यात भाजप किंवा त्यांच्या विचारांचे सरकार नको आहे.” उद्या काॅंग्रेसची बैठक – उद्या सकाळी ९.३० वाजता चेन्नईमध्ये ‘तमिळनाडू प्रदेश काँग्रेस कमिटी’ची (TNCC) राजकीय व्यवहार समितीची बैठक होईल. या बैठकीत स्थानिक नेत्यांच्या भावना आणि राज्यातील राजकीय परिस्थितीचा विचार करून विजय यांना पाठिंबा द्यायचा की नाही, याचा अंतिम निर्णय घेतला जाईल. दिल्लीतील बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि प्रभारी गिरीश चोडणकर यांनी प्राथमिक चर्चा केली आहे. ‘बदलावासाठी जनतेचा कौल’ – तमिळनाडू काँग्रेसचे प्रभारी गिरीश चोडणकर यांनी विजय यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, “राज्यातील तरुणांनी आणि महिलांनी विजय यांना मोठ्या प्रमाणात साथ दिली आहे. हा निकाल बदलाची लाट दर्शवतो. आम्ही जनतेच्या निर्णयाचा आदर करतो. TVK ने त्यांच्या विधिमंडळ नेत्याची निवड केल्यानंतर अधिकृत चर्चा पुढे जाईल.” तमिळनाडूच्या राजकारणात आता काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार असून, उद्या होणाऱ्या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आणखी आमदारांची गरज पडणार – दरम्यान, तामिळनाडू विधानसभेत काॅंग्रेसचे 5 आमदार निवडून आले आहेत. त्यांनी विजय यांना पाठिंबा दिला तरीदेखील आणखी 5 आमदारांची आवश्यकता आहे. तसेच पीएमके -4, आययूएमएल – 2 आणि सीपीआय पक्षाचे 2 आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे विजय काॅंग्रेसबरोबरच या इतर पक्षांशी बोलणी करून सत्ता स्थापन करू शकतात.