Video : घोडेवाला अन् ड्रायव्हर ठरले देवदूत! आसावरीने सांगितला दहशतवादी हल्ल्यानंतरचा शहारे आणणारा अनुभव…
Pahalgam attack । Pune News : कधी नव्हे इतका सुंदर प्रवास करायला निघालेल्या एका कुटुंबाच्या आयुष्याला क्षणार्धात हादरा बसला. काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाला.
संतोष जगदाळे आणि त्यांचे मित्र कौस्तुभ गनबोटे हे त्या भयावह हल्ल्यात मृत्युमुखी पडले. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांवर मात्र केवळ आभाळ कोसळलं नाही, तर रक्ताच्या थारोळ्यातून जीव वाचवण्याचा संघर्षही करावा लागला.
संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी, आई आणि नातेवाईक त्या हल्ल्यातून सुदैवाने बचावले. पण त्यांच्या मदतीला आलेली माणसं, त्या प्रसंगी दाखवलेली माणुसकी, ही त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरली. “आम्हाला वाचवायला आलेल्या घोडेवाल्याचं नाव मला आठवत नाही, पण त्याने आमच्यासोबत जे केलं, ते मी कधीच विसरू शकणार नाही,” असं आसावरी सांगते.
ती पुढे म्हणते, “त्या घोडेवाल्याला समजलं की आमच्या कुटुंबातले दोघं पुरुष गेले, आणि फक्त आम्ही तिघी स्त्रिया उरलोय. पण तो पळून गेला नाही. उलट म्हणाला, ‘मैडम, आप हमारी सवारी हैं, हम आपको लेकर जाएंगे।’ माझी आई जखमी होती, पडलेली होती – उठता येत नव्हतं. त्याने स्वतः तिला उचललं, घोड्यावर बसवलं.”
त्या भीषण अवस्थेतही त्या माणसाने त्यांच्याकडून एकही रुपया घेतला नाही. “आम्ही त्याला सांगितलं की वडिलांनी पैसे दिले की नाही माहित नाही, पण तुमचं काही राहिलं असेल तर नक्की सांगा. तेव्हा तो म्हणाला, ‘सोचिए मत’। ते शब्द ऐकून मला भरून आलं,” असा भावनिक क्षणही आसावरी सांगते.
या हल्ल्यात एकूणच माणुसकीची अनेक रूपं अनुभवायला मिळाली. त्यांच्या सोबतचा ड्रायव्हर – जो फक्त प्रवासासाठी ठरवलेला होता – तो माणूस त्यांचं कुटुंबच होऊन गेला. “पहिल्याच दिवशीपासून आमच्यासोबत असलेला ड्रायव्हर, माझा हात पकडून रडत होता. ‘सिस्टर, क्या हो गया आपके साथ?’ तो स्वतः आजारी होता, पण एक क्षणासाठीही आमच्यापासून दूर गेला नाही,” असं सांगताना आसावरीचा कंठ दाटून येतो.
ती पुढे म्हणते, “मी त्याला सांगितलं होतं की गाडी घेऊन तयार रहा, आणि तो अक्षरशः रात्रभर जागा होता. आमची पहाटेची फ्लाइट होती आणि तो एकटाच झोपला नव्हता, कारण त्याला काळजी होती – आम्ही सुखरूप पोहोचतोय ना.”
हल्ल्यानंतर त्यांना लष्कर आणि स्थानिक प्रशासनाचा आधारही मिळाला. पण आसावरीला आठवत राहतात त्या दोन अनोळखी लोकांच्या मदतीच्या आठवणी – एक घोडेवाला आणि एक ड्रायव्हर – ज्यांनी कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, केवळ माणुसकीपोटी त्यांना वाचवलं.
“आज आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, ते या दोन माणसांमुळे आणि लष्कराच्या मदतीमुळे. पण या प्रसंगात मी माणुसकीचं खरं रूप पाहिलं – जे संकटाच्या काळातही निस्वार्थपणे तुमच्यासोबत उभं राहतं,” असं म्हणत आसावरीच्या डोळ्यांत अश्रू दाटतात.
दहशतवादाच्या अंधारातही ही माणुसकीची झुळूक आशेचा किरण घेऊन येते. अशा काळात, हेच अनुभव सांगून जातात की माणसातली माणुसकी हीच खरी देवता असते.




