Lok Sabha Election 2024| आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाने काल रविवारी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत 111 जणांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यावेळी भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून पीलभीत मतदार संघातून खासदार वरुण गांधी यांना संधी मिळणार की नाही? यावरून चर्चा सुरू होती. मात्र रविवारी जाहीर केलेल्या यादीतून खासदार वरुण गांधी यांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
वरुण गांधींच्या जागी कोणाला मिळाली संधी?
पिलीभीतमधून वरुण गांधी यांचे तिकीट कापून जितिन प्रसाद यांना तिकीट देण्यात आले आहे. तर भाजपने सुलतानपूरमधून वरुण गांधी यांच्या आई मनेका गांधींवर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. वरुण गांधी प्रतिनिधित्व करत असलेल्या उत्तर प्रदेशातील पिलीभीत लोकसभा जागेसाठी सत्ताधारी भाजपाकडून त्यांना तिकीट मिळण्याबाबत अनिश्चितता होती. आता यादी आल्यानंतर त्यांचा पत्ता कट झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.
वरुण गांधींची भूमिका काय असणार?
पिलीभीत येथे पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. भाजप यंदा वरुण गांधींना उमेदवारी देण्याची शक्यता कमी होती, त्या अपेक्षेप्रमाणे त्यांना तिकिट नाकारण्यात आले आहे. त्यामुळे आता वरुण गांधी पिलीभीतमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातील सहारनपूरहून राघव लखनपाल, बदायूंहून दुर्विजय सिंह शाक्य बरेलीहून छत्रपाल सिंह गंगवार, सुल्तानपूरमधून मनेका गांधी, पीलभीतमधून जितिन प्रसाद, मुरादाबादमधून सर्वेश सिंह, मेरठमधून अरुण गोविल, गाजियाबादमधून अतुल गर्ग, अलीगढमधून सतीश गौतम, हाथरसमधून अनुप वाल्मिकी, बहराईचमधून अरविंद गोंड, कानपूरमधून रमेश अवस्थी, बाराबंकीतून राजरानी रावत यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
या कारणामुळे तिकीट नाकारल्याची शक्यता
कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये बहुतांश नेत्यांनी वरुण यांचे तिकीट रद्द करण्याची मागणी केली होती. वरुण यांचे सतत पक्षाविरोधात बोलणे हे त्यामागचे कारण असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांचे तिकीट डावलून त्यांच्या जागी योगी सरकारमधील मंत्री जितीन प्रसाद यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. त्यानुसार भाजपच्या पाचव्या यादीत त्यांना संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा: