Varun Chakravarthy Threat : ‘भारतात येऊ नकोस…’, टीम इंडियाच्या मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला मिळाली होती धमकी; स्वत;च केला खुलासा

Varun Chakravarthy had received a threat : भारतीय क्रिकेट संघाने नुकतेच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे जेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या विजयात स्टार फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचाही मोठा वाटा होता. वरुणच्या फिरकी चेंडूंना सामोरे जाण्यासाठी कोणत्याच फलंदाजाकडे उत्तर नव्हते. या स्पर्धेत वरुणने एकूण ९ विकेट्स घेतल्या. पण एक काळ असा होता, जेव्हा क्रिकेट चाहत्यांनी वरुणचं जगणं कठीण केलं होतं. नक्की त्याच्यासोबत काय घडलं होतं? जाणून घेऊया.
वरुण चक्रवर्तीसोबत नेमकं काय घडलं होतं?
वरुणने सांगितले की, २०२१ च्या टी-२० विश्वचषकानंतरचा टप्पा त्याच्यासाठी कठीण काळ होता. या काळात त्याला त्याला धमकीचे फोनही आले आणि काही लोक त्याचा पाठलाग करायचे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये वरुण चक्रवर्तीची कामगिरी चमत्कारापेक्षा कमी नव्हती. जसप्रीत बुमराहला दुखापत झाल्यानंतर वरुणने संघात सामील होऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने फक्त तीन सामने खेळले आणि 9 विकेट्स घेतल्या. यासह, तो स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक बनला.
हा माझ्यासाठी वाईट काळ होता – वरुण चक्रवर्ती
एका यूट्यूब शोमध्ये वरुणने प्रसिद्ध अँकर गोबीनाथला सांगितले, “हा माझ्यासाठी वाईट काळ होता. मी निराश झालो होतो. कारण मला वाटले की मी विश्वचषकासाठी निवड झालेल्या संघाला न्याय देऊ शकलो नाही. मला एकही विकेट घेता आली नाही याचे दुःख होते. त्यानंतर तीन वर्षे माझी निवड झाली नाही, त्यामुळे मला वाटते की संघात परतणे माझ्या पदार्पणापेक्षा खूप कठीण होते.”
२०२१ च्या विश्वचषकानंतर धमकीचे फोन आले –
फिरकीपटू पुढे म्हणाला, “कारण २०२१ च्या विश्वचषकानंतर मला धमकीचे फोन आले होते. मला भारतात येऊ नको असे सांगण्यात आले. लोक माझ्या घरी आले, मला शोधत होते. मला अनेक वेळा लपून राहावे लागले. मी विमानतळावरून परतत असताना काही लोक त्यांच्या बाईकवरून माझा पाठलाग करायचे. असं घडत चाहते भावनिक असतात हे मी समजू शकतो. पण जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला आनंद होतो.”
२०२१ नंतर खूप काही बदलावे लागले –
वरण चक्रवर्ती पुढे म्हणाला, “मला स्वतःमध्ये (२०२१ नंतर) खूप काही बदलावे लागले२०२१ च्या विश्वचषकानंतर मला धमकीचे फोन आले. मला माझा दिनक्रम आणि सराव बदलावा लागला. पूर्वी मी एका सत्रात ५० चेंडूंचा सराव करायचो, मी तो दुप्पट केला. निवड समिती मला परत बोलावेल की नाही हे माहित नसणे कठीण होते. तिसऱ्या वर्षानंतर मला वाटलं सगळं संपलं. मात्र यानंतर आम्ही आयपीएल जिंकलो आणि मग मला फोन आला. त्यानंतर मी खूप आनंदी होतो.” आता वरुण चक्रवर्ती चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पुन्हा एकदा आयपीएल २०२५ साठी केकेआरच्या ताफ्यात सज्ज झाला आहे.





