Vande Mataram : वंदे मातरमची पहिली दोनच कडवी गाणार; काँग्रेस कार्यकारिणीचा मोठा निर्णय
काँग्रेस कार्यकारिणीच्या बुधवारी पार पडलेल्या चार तासांहून अधिक काळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत वंदे मातरम् (Vande Mataram) या राष्ट्रीय गीताबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Vande Mataram : काँग्रेस कार्यकारिणीच्या बुधवारी पार पडलेल्या चार तासांहून अधिक काळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत वंदे मातरम् (Vande Mataram) या राष्ट्रीय गीताबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेसच्या सर्व अधिकृत कार्यक्रमांमध्ये (Vande Mataram) यापुढे या राष्ट्रीय गीताची केवळ पहिली दोनच कडवी गायली जातील, असा निर्णय पक्षाच्या १९३७ मधील सर्वोच्च निर्णय घेणाऱ्या समितीच्या ठरावाला अनुसरून घेण्यात आला आहे.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. १९३७ मध्ये काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाशी आम्ही ठामपणे बांधील आहोत. या निर्णयाबाबत पक्षात कोणताही संभ्रम नाही.
१९३७ च्या या ऐतिहासिक ठरावावेळी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस आणि सरदार वल्लभभाई पटेल यांसारखे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. त्यांनी जो निर्णय घेतला होता, तोच मार्ग काँग्रेसचे कार्यकर्ते स्वीकारतील. पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये केवळ दोनच कडवी गायली जाणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी होय, पहिली दोनच कडवी, असे स्पष्ट केले.
वेणुगोपाल यांनी भाजपवर टीका करताना सांगितले की, वंदे मातरम् आणि राष्ट्रगीत हे काँग्रेससाठी भावनिक विषय आहेत, तर भाजपसाठी ते केवळ राजकारणाचे साधन आहे. सोनिया गांधी यांच्यावरील भाजपच्या टीकेला प्रत्यत्तर देताना ते म्हणाले की, पेपर लीक आणि चंदा चोरी यांसारख्या मुख्य राष्ट्रीय मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजप हे वाद निर्माण करत आहे.
काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी स्पष्ट केले की, २८ ऑक्टोबर १९३७ रोजी रवींद्रनाथ टागोर यांच्या सूचनेवरून कॉंग्रेस कार्यकारीणीच्या बैठकीत वंदे मातरम्बाबत ठराव मंजूर करण्यात आला होता. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी स्पष्ट केले होते की जन गण मन… हे आपले राष्ट्रगीत असेल आणि वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत असेल.
चार मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश
काँग्रेसच्या चार मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यातील शिक्षण आणि परीक्षा पद्धतीत आवश्यक असलेल्या सुधारणांवर अहवाल तयार करून तो एका महिन्याच्या आत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सादर करावा, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
याशिवाय, देशातील सुमारे ८०० शहरांमध्ये छात्रों की गूंज कार्यक्रम आयोजित केला जाणार असून, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी विविध शहरांमधील या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. हा कार्यक्रम यापूर्वी कोटा, डेहराडून आणि प्रयागराज येथे पार पडला असून येत्या शनिवारी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे.
सूत्रांनुसार, राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्र्यांनी शिक्षणतज्ज्ञ आणि सर्व संबंधितांशी चर्चा करून हा अहवाल तयार करावा, जेणेकरून विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी शिक्षण (Vande Mataram) आणि परीक्षा व्यवस्थेत ठोस सुधारणा करता येतील.






