Explainer: ‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास; राष्ट्रीय सन्मान (दुरुस्ती) विधेयक 2026 नेमके काय? जाणून घ्या
Explainer: लोकसभेत राष्ट्रीय सन्मान (दुरुस्ती) विधेयक 2026 मंजूर. 'वंदे मातरम्'च्या गायनात अडथळा आणल्यास 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद. 1971 च्या कायद्यात काय बदल होणार, राष्ट्रगीत-राष्ट्रगानाचे नवे नियम आणि वंदे मातरम्चा इतिहास जाणून घ्या.

Explainer: लोकसभेने गुरुवारी राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध (दुरुस्ती) विधेयक, 2026 मंजूर केले. यापूर्वी 29 जुलै रोजी हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले होते. आता राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे. या दुरुस्तीमुळे राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध अधिनियम, 1971 मधील कलम 3 मध्ये बदल करून राष्ट्रय गीत ‘वंदे मातरम्’ याचाही समावेश करण्यात येणार आहे.
या विधेयकानंतर ‘वंदे मातरम्’च्या गायनात जाणूनबुजून अडथळा आणणे किंवा गायन सुरू असताना सभेत व्यत्यय निर्माण करणे हा दंडनीय गुन्हा ठरणार आहे.
विधेयकात काय प्रस्तावित आहे?
दुरुस्ती विधेयकानुसार, एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ किंवा राष्ट्रगीत ‘जन गण मन’ यांच्या गायनात अडथळा आणला अथवा गायन सुरू असलेल्या सभेत व्यत्यय निर्माण केला, तर संबंधित व्यक्तीला कमाल तीन वर्षांचा कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
हे विधेयक आणण्याची गरज का भासली?
24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी स्पष्ट केले होते की, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम्’ला भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानामुळे ‘जन गण मन’प्रमाणेच समान सन्मान आणि दर्जा दिला जाईल.
मात्र, विद्यमान कायद्यात ‘वंदे मातरम्’च्या अपमानाबाबत किंवा त्याच्या गायनात अडथळा आणल्यास कारवाई करण्याची स्वतंत्र तरतूद नव्हती. ही उणीव दूर करण्यासाठी कलम 3 मध्ये राष्ट्रीय गीताचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंध अधिनियम, 1971 म्हणजे काय?
23 डिसेंबर 1971 रोजी संसदेत हा कायदा मंजूर करण्यात आला होता. भारताचा राष्ट्रीय ध्वज, संविधान आणि राष्ट्रगीत यांचा सन्मान अबाधित ठेवणे आणि त्यांचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा देणे हा या कायद्याचा उद्देश आहे. हा कायदा संपूर्ण देशभर लागू आहे.
1971 च्या कायद्यातील प्रमुख तरतुदी –
1. कलम 2 : राष्ट्रीय ध्वज आणि संविधानाचा अपमान
राष्ट्रीय ध्वज जाळणे, ध्वज फाडणे, ध्वज विकृत करणे किंवा अस्वच्छ करणे, ध्वज पायाखाली तुडवणे, ध्वजाचा अपमान करणे, भारतीय संविधानाचा अपमान करणे अशी कोणतीही कृती सार्वजनिक ठिकाणी किंवा सार्वजनिकरीत्या केल्यास ती गुन्हा मानली जाते. अशा प्रकरणात तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मात्र, संविधान किंवा राष्ट्रीय ध्वजाबाबत कायदेशीर मार्गाने टीका करणे किंवा दुरुस्तीची मागणी करणे हा गुन्हा मानला जात नाही.
2. कलम 3 : राष्ट्रगीताच्या गायनात अडथळा
एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून… राष्ट्रगीत ‘जन गण मन’ थांबवणे किंवा राष्ट्रगीत सुरू असलेल्या सभेत व्यत्यय आणणे असे केल्यास त्यालाही तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
3. कलम 3A : पुन्हा गुन्हा केल्यास कठोर शिक्षा
या कायद्यात नंतर कलम 3A समाविष्ट करण्यात आले. त्यानुसार, कलम 2 किंवा कलम 3 अंतर्गत दोषी ठरलेल्या व्यक्तीने पुन्हा त्याच प्रकारचा गुन्हा केल्यास दुसऱ्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी किमान एक वर्षाचा कारावास अनिवार्य असेल.
या कायद्यात आधी काय समाविष्ट नव्हते?
1971 च्या कायद्यात… राष्ट्रीय ध्वज, भारतीय संविधान, राष्ट्रगीत ‘जन गण मन’ यांचा समावेश होता.
मात्र राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’चा उल्लेख नव्हता. त्यामुळे त्याच्या गायनात अडथळा आणणाऱ्यांवर या कायद्यानुसार थेट कारवाई करणे शक्य नव्हते. दुरुस्ती विधेयकामुळे ही उणीव भरून काढण्यात आली आहे.
राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीताबाबत केंद्र सरकारचे नवे निर्देश –
राष्ट्रीय सन्मान (दुरुस्ती) विधेयक येण्यापूर्वी 9 जुलै 2026 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ आणि राष्ट्रगीत ‘जन गण मन’ यांच्या गायन व वादनासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या.
हे निर्देश सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश तसेच केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना पाठवण्यात आले असून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यास सांगण्यात आले आहे.
या मार्गदर्शक सूचनांमध्ये… कोणत्या प्रसंगी राष्ट्रीयगीत आणि राष्ट्रगीत गायले किंवा वाजवले जाईल, कोणत्या कार्यक्रमांत दोन्हींचा वापर होईल, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि शेवटी दोन्ही सादर करण्याचे नियम, अधिकृत शब्द आणि योग्य उच्चार वापरण्याची सक्ती, यांचा समावेश आहे.
राष्ट्रीयगीत आणि राष्ट्रगीत एकत्र सादर करताना कोणता क्रम?
गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, एखाद्या कार्यक्रमात राष्ट्रीयगीत आणि राष्ट्रगीत दोन्ही सादर केले जात असल्यास…प्रथम ‘वंदे मातरम्’ त्यानंतर ‘जन गण मन’ हा क्रम अनिवार्य राहील. एखाद्या राज्यात राज्यगीतही सादर होत असल्यासही हाच क्रम लागू असेल.
अधिकृत शब्द आणि योग्य उच्चारांवर भर
गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की राष्ट्रीयगीत आणि राष्ट्रगीताचे अधिकृत शब्द आणि योग्य उच्चार यांचाच वापर केला जावा. दोन्हींचे अधिकृत पाठ आणि योग्य उच्चार गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राज्य सरकारे, केंद्रशासित प्रदेश तसेच संबंधित संस्था आणि विभागांनीही आपल्या अधिनस्त कार्यालयांना या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यास सांगितले आहे.
राष्ट्रीय गीताबाबतचे विशेष निर्देश –
‘वंदे मातरम्’च्या अधिकृत आवृत्तीचा कालावधी सुमारे 3 मिनिटे 10 सेकंद आहे. याशिवाय, कोणत्या औपचारिक कार्यक्रमांत राष्ट्रगीत सादर करायचे, कोणत्या प्रसंगी सामूहिक गायन करता येईल, राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत दोन्ही असल्यास राष्ट्रीय गीत प्रथम सादर करणे, अधिकृत आवृत्ती सुरू असताना उपस्थितांनी शक्यतो सावधान स्थितीत उभे राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
दुरुस्तीची मागणी का झाली?
2025 मध्ये ‘वंदे मातरम्’च्या रचनेला 150 वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने केंद्र सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या विषयावर चर्चा घडवून आणली होती. तसेच संसदेत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आणि अनेक राज्यांत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
याशिवाय, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांनंतर ‘वंदे मातरम्’च्या गायनावरून राजकीय वाद अधिक तीव्र झाला. सरकारी कार्यक्रमांत राष्ट्रीय गीत गायले जावे की नाही, यावर भाजप आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) यांच्यात वाद निर्माण झाला.
भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर पश्चिम बंगालमधील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळा तसेच मदरशांमधील सकाळच्या प्रार्थनेसत्रात ‘वंदे मातरम्’चे गायन अनिवार्य करण्यात आले.
‘वंदे मातरम्’चा इतिहास –
-‘वंदे मातरम्’ची रचना बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केली.
-7 नोव्हेंबर 1875 रोजी हे गीत प्रथम ‘बंगदर्शन’ या साहित्यिक मासिकात प्रकाशित झाले.
-1882 मध्ये ते त्यांच्या प्रसिद्ध ‘आनंदमठ’ या कादंबरीत समाविष्ट करण्यात आले.
-रवींद्रनाथ टागोर यांनी या गीताला संगीत दिले.
-स्वातंत्र्यलढ्यात ‘वंदे मातरम्’ हे ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या संघर्षाचे आणि देशभक्तीचे प्रमुख प्रतीक बनले.
-1907 मध्ये मॅडम भीकाजी कामा यांनी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे प्रथमच परदेशात भारतीय ध्वज फडकावला. त्या ध्वजावर ‘वंदे मातरम्’ असे अंकित होते.
-2025 मध्ये या गीताच्या रचनेला 150 वर्षे पूर्ण झाली. हा टप्पा भारताच्या राष्ट्रीय ओळखीचा आणि स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील महत्त्वाचा मैलाचा दगड मानला जातो.





