बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची काल (दि २४) सुनावणी पार पडली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मीक कराडचा प्रथमदर्शी कुठेही सहभाग दिसून येत नाही, असा युक्तिवाद झालेल्या सुनावणीवेळी वाल्मिक कराड याच्या वकिलांनी केला. वाल्मिक कराडच्या वकिलांनी डिस्चार्ज अॅप्लिकेशन देखील दाखल केले होते. त्यावर गुरुवारी सरकार पक्षाचे म्हणणे सादर करण्यात आले. विष्णू चाटेच्या वकिलांनीही डिस्चार्ज अॅप्लिकेशन दाखल करत त्याला बीडच्या कारागृहात हलवण्याची मागणी न्यायालयाकडे अर्जाद्वारे केली. पुढील सुनावणी ७ मे रोजी होणार आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी बीडच्या विशेष मोका न्यायालयात गुरुवारी झाली. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने अॅड. कोल्हे यांनी, तर आरोपींच्या वतीने अॅड. विकास खाडे यांनी बाजू मांडली. दरम्यान, या आधीच्या सुनावणीमध्ये आरोपीच्या वकिलांनी मागितलेली दोषारोप पत्रातील गोपनीय माहिती तसेच डिजिटल पुरावे देण्यात आले आहेत. तसेच मागील सुनावणी मध्ये वाल्मीक कराडने माझा आणि या गुन्ह्याचा काही संबंध नाही. मी निर्दोष आहे. मला दोष मुक्त करा अशी मागणी कोर्टाकडे केली होती. तसेच विष्णू चाटे याने मला बीड जेलमध्ये ठेवावे असा अर्जही केला होता. या अर्जावर काल (दि. २४) सुनावणी पार पडली. चार्ज फ्रेम होण्याची स्टेज अजून आलेली नाही. डिस्चार्ज अर्जावर सगळ्या पक्षांचे म्हणणे झाल्यावरच न्यायालय निर्णय देईल, आणि त्यानंतरच चार्ज निश्चितीची प्रक्रिया सुरू होईल, असं वाल्मिक कराडचे वकील अॅड. विकास खाडे यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणाच्या दोषारोपपत्रातील सर्व कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे अद्याप सर्व आरोपींना मिळालेली नाहीत. काही आरोपींचे जबाब सादर झाले असले तरी इतरांच्या जबाबांची अद्याप प्रतीक्षा आहे. त्यामुळे कोर्टाने आजची सुनावणी तहकूब केली असंही वाल्मिक कराडच्या वकिलांनी सांगितले.