Beed Crime news : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत खळबळजन माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराड सध्या जेलमध्ये असला तरी त्याच्या कार्यकर्त्यांची दहशत कायम असल्याचे बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वांभर गोल्डे यांच्या जबाबातून समोर आले आहे. वाल्मिक कराड हा गुंड असल्याची माहिती असताना देखील बीड पोलिस दोन कर्मचारी देऊन त्याला संरक्षण देत होते, हे उघड झाले आहे. विश्वांभर गोल्डे यांच्या जबाबामुळे बीड पोलिस नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर राज्य सरकारकडून विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. एसआयटी आणि सीआयडीने संयुक्तपणे या हत्याप्रकरणाता तपास केला होता. त्यावेळी सीआयडीचे उपमहानिरीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी विश्वांभर गोल्डे यांचा जबाब नोंदवून घेतला होता. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी हा जबाब नोंदवण्यात आला होता. या जबाबाचा तपशील आता समोर आला असून त्यामध्ये विश्वांभर गोल्डे यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत. वाल्मिक कराडच्या सुरक्षेसाठी बीड पोलिस तैनात वाल्मिक कराडला अटक करून बीड शहर पोलिस ठाण्यातील कोठडीत ठेवले. मात्र, त्याची दहशत असल्याचा दावा करत त्याच्यासह परिसरात १८ अंमलदार आणि दोन आरसीपी प्लाटून बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. तसेच २२ जानेवारी रोजीही न्यायालयात हजर करताना ६ अधिकारी, ३३ पुरुष व सहा महिला कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते, असे विश्वांभर गोल्डे यांनी म्हटले आहे. तसेच वाल्मिक कराडने ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमर्पण केले होते. तेव्हा त्याला खंडणी प्रकरणात अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. परंतु, वाल्मिक कराडला पहिल्यांदा अटक झाल्यानंतर त्याच्यावर संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असा दावाही विश्वांभर गोल्डे यांनी यावेळी केला. त्यामुळे बीड पोलीस दल नव्या वादात सापडण्याची शक्यता आहे.