Vaibhav Abhishek Conversation : ‘समोर खेळू की मागे मारू…’, अभिषेकने फलंदाजीसाठी घेतला युवा वैभवचा सल्ला, दोघांचे संभाषण स्टंप माइकमध्ये कैद
Vaibhav Abhishek Conversation : या सामन्यादरम्यान सलामीवीर अभिषेक शर्मा आणि पदार्पणवीर वैभव सूर्यवंशी यांच्यात खेळपट्टीवर झालेला एक अत्यंत रंजक संवाद सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Vaibhav Sooryavanshi Abhishek Sharma Stump Mic Conversation Video Viral : भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी याने पदार्पण करत इतिहास रचला. संजू सॅमसनच्या जागी प्लेइंग इलेव्हनममध्ये स्थान मिळालेल्या वैभवला या सामन्यात केवळ १४ धावा करता आल्या, तरीही त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीची झलक दाखवली. मात्र, या सामन्यादरम्यान सलामीवीर अभिषेक शर्मा आणि पदार्पणवीर वैभव सूर्यवंशी यांच्यात खेळपट्टीवर झालेला एक अत्यंत रंजक संवाद सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
स्टंप माईकमध्ये कैद झाली इनसाईड स्टोरी –
मँचेस्टरची खेळपट्टी सुरुवातीला गोलंदाजांना पूरक ठरत असल्याने दोन्ही फलंदाजांना नवीन चेंडू खेळताना काही अडचणी येत होत्या. वैभवने जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर एक शानदार षटकार खेचून आपले इरादे स्पष्ट केले होते. याच दरम्यान, खेळपट्टीचा नूर ओळखण्यासाठी सीनियर फलंदाज अभिषेक शर्माने थेट १५ वर्षांच्या वैभवचा सल्ला घेतला. स्ट्राईकवर असलेल्या अभिषेकने वैभवला विचारले, “मी चेंडू सरळ मारू की मागच्या बाजूला खेळू? तुला काय वाटतं?”
Vaibhav Sooryavanshi’s advice to Abhishek Sharma caught on camera!pic.twitter.com/c7whbj4zX5
— Shashank (@Shashankmsdian) July 5, 2026
यावर अवघ्या १५ वर्षांच्या वैभवने अत्यंत परिपक्वतेने उत्तर दिले. तो म्हणाला, “चेंडूचा अंदाज नीट घे. कारण चेंडू डबल बाऊन्स (दोनदा उसळी) होतोय. या चेंडूचा वेग कमी होता आणि त्याची उसळीही कमी होती.” स्टंप माईकमध्ये कैद झालेला हा संवाद सध्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
सचिन तेंडुलकरचा मोडला ऐतिहासिक रेकॉर्ड –
या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच वैभवने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा ३७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. वैभव हा वयाच्या अवघ्या १५ वर्षे आणि ९९ दिवसांचा असताना भारतासाठी आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. त्याच्याआधी ३७ वर्षांपूर्वी सचिनने १६ वर्षे २०५ दिवस वय असताना पदार्पण केले होते.
दरम्यान, या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १९० धावा केल्या होत्या. मात्र, इंग्लंडने जेकब बेथेलच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ६ चेंडू आणि ४ गडी राखून हे लक्ष्य गाठले. या विजयासह इंग्लंडने ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.





