मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे यांनी उत्तर प्रदेशमधील निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर थेट योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. सोलापूरमध्ये एका कार्यक्रमात शेतकऱ्यांसमोर भाषण देताना प्रणिती शिंदेंनी योगी आणि महाराज राजकारणात आल्यावर देशाचे वाटोळे होते, असे म्हणत आदित्यनाथांवर सडकून टीका केली आहे.
“उत्तर प्रदेशची निवडणूक जवळ आल्यानंतर शेतकरी कायदे रद्द केले. एक वर्ष तुम्ही वाट पाहिली. ७०० शेतकऱ्यांचे तुम्ही बळी घेतले आणि मग कायदे मागे घेतले. लाज वाटायला पाहिजे,” असा टोला प्रणिती शिंदेंनी केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकावर टीका करताना लगावला आहे. त्याचप्रमाणे पुढे बोलताना प्रणिती यांनी योगी आणि महाराजांची जागा मठांमध्ये आणि मदिरांमध्ये आहे असे म्हणत टोला लगावला आहे.
“योगी, महाराज यांच्याबद्दल आहे आम्हाला मान पण त्यांचं स्थान आहे मंदिरामध्ये आणि मठात राजकारणात नाही. ज्या दिवशी देशाच्या राजकारणात योगी आणि महाराज येतात त्या दिवशी देशाचं वाटोळं सुरु होतं,” असे त्या भाषणात म्हणाल्या. त्यांचे हे शब्द ऐकून उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांच्या वक्तव्याला प्रतिसाद दिला.
काम पाहून मतदान केलं पाहिजे असंही प्रणिती यांनी म्हटलंय. “जे काम करतात त्यांना मतदान करणं महत्वाचं आहे. लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर कामाला महत्व द्या,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना भाषणादरम्यान केले.