मुंबई, : शेतकऱ्यांचे कृषीपंप आणि वीज ग्राहकांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत कुणाचीही वीज जोडणी तोडू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत दिले. वीजबिलांच्या थकबाकीसंदर्भात विधीमंडळात चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे. चर्चा होऊन दोन्ही बाजूंच्या सभासदांचे समाधान होईपर्यंत राज्यातील कृषीपंप आणि ग्राहकांची वीज जोडणी तोडण्यात येणार नाही. राज्यातील वीज थकबाकीसंदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आज विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून विजेवर चर्चा घेण्याचा आग्रह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धरला. त्यावर वीज थकबाकी संदर्भात विशेष बैठक आयोजित करुन चर्चा करण्याची सरकारची तयारी असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. वीज जोडणी कापण्याच्या मोहिमेला स्थगिती दिल्याबद्दल फडणवीस यांनी उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले.