Maharashtra Rain : राज्यात अवकाळी पावसाचं थैमान, पिकांचे नुकसान, शेतकरी चिंतेत; भंडाऱ्यात दोन शेतमजुरांचा मृत्यू

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात ठिकठिकाणी गारपीट, वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने पुढील तीन दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याचे म्हटले आहे. सध्या महाराष्ट्रात चक्राकार वाऱ्याची निर्मिती झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. वादळी वारे, गारपिटीमुळे पीक, फळबागांचे मोठे नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातील ३० गावांमधील एक हजार २९८ हेक्टरचे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हळद काढणी व प्रक्रियेचे काम सुरू आहे. त्यात अडथळा आल्याने शेतकरी चिंतेत आहे.
विदर्भातील नागपूरसह बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात वळवाने गुरुवारी दमदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. शुक्रवारी विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातही वळवाने हजेरी लावली. पुणे, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी वळवाने दमदार हजेरी लावली.
छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्याला वादळी वारे, गारपिटीमुळे पिक, फळबागांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी बुधवारी रात्री पाऊस झाला. गुरुवारीही पावसाने हजेरी लावली. जालना शहर व जिल्ह्यालाही पावसाने झोडपले. भोकरदन तालुक्यात रात्री गारपीट झाली. हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ परिसरातही पावसाने हंगामी पिकांना हानी पोहोचली.
सध्या हळद काढणी व प्रक्रियेचे काम सुरू आहे. पावसाने शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागला. त्यामुळे हलक्या दर्जाची हळद होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. धाराशिव जिल्ह्यात भूम, तेर, लोहारा तर लातूर जिल्ह्यात जळकोट, लातूर, औसा, रेणापुरात विजांच्या कडकडाटसह पाऊस पडला. परभणी जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. रात्री काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
भंडारा जिल्ह्यात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू
भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील पाथरी येथील शेत शिवारात वीज कोसळून शेतात काम करणाऱ्या दोन शेतमजुरांचा मृत्यू झाला. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होत आहे. काही ठिकाणी जोरदार वारा देखील आहे. यात काही ठिकाणी वीज पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
कोकणात अवकाळी पावसामुळे आंबे गळून पडले
कोकणात सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. एका तासाच्या पावसामुळे तयार झालेले आंबे गळून पडले आहेत. अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे आंब्यावर काळे डाग पडण्याची शक्यता आहे. तसेच मे महिन्यात तयार होणाऱ्या लहान कैऱ्यांचेही नुकसान झाले आहे.
नाशिकमध्ये गहू, हरभरा, द्राक्ष आणि कांदा पिकांचे नुकसान
नाशिक शहरालाही अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. शहराच्या परिसरातील शिंदे पळसे, माडसांगवी, शिलापूर येथे गारपीट झाली. काही भागांत मध्यम, तर काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला.अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे गहू, हरभरा, द्राक्ष आणि कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे
हवामान विभगाने राज्याला पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात वादळी वाऱ्यासाह पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे. हवामान विभगाने राज्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरित ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.





